न्हावरे – मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांकडे पहिलवानच नाही. मग देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री महाराष्ट्रात सभा का घेतात? अहो, मुख्यमंत्री कुठल्या चष्म्याने पाहता. चष्मा बदला आता…, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी बंजारा सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा बॅंकेचे संचालक माणिकराव गोते, शिरुर मार्केट कमिटीचे सभापती शशिकांत दसगुडे, कॉंग्रेसचे कौस्तुभ गुजर, महेश ढमढेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरकाका भूमकर, जितेंद्र बढेकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशचे सरचिटणीस प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, उपसभापती जयमाला जकाते, उद्योजक भाऊसाहेब महाडीक, लोणीकंदचे सरपंच सागर गायकवाड, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम आदी मान्यवर व शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी राज्यात एकास एक असे सर्वच तुल्यबळ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले असून विरोधक खोटा अपप्रचार करत आहेत. राज्यावर सध्या सर्वाधिक कर्ज आहे. राज्याला कंगाल करण्याचे काम युती शासन करत आहे. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास तीन महिन्यांत सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे अजित पवार यांनी नमूद केले.
“ते’ जित्राबांची काय गय करणार?
एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सावरा, विनोद तावडे, दिलीप कांबळे या भाजपच्या निष्ठावंतांवर भाजपने जातीपातीचे राजकारण करून वाईट दिवस आणले. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या जित्राबांची काय गय करणार, अशी खिल्ली अजित पवार यांनी शिरूर-हवेली मधून राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या स्वयंघोषित नेत्यांची उडवली. ते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी व स्वतःचे काळे धंदे वाचवण्यासाठी पक्ष सोडून गेलेले आहेत, असे त्यांनी नमूद केले.