कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर करोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहे. यामुळे आता ममता सरकारने, करोना परीक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ करत, या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट समितीच्या क्षेत्राधिकारातही बदल केला असून लॉकडाऊन कठोर करण्याची आपली रणनीती बदलली आहे. एवढेच नाही, तर ममता सरकारने यासंदर्भात निवडणूक डावपेचातील राजकीय धोरणकार (पोलिटीकल स्ट्रॅटेजिस्ट) प्रशांत किशोर यांच्याशीही संपर्क साधला आहे.
तृणमूल कॉंग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, आरोग्यविषयक कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. ही रननीती बदलली नसती तर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.
तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमधून येणारे अहवाल चिंताजनक होते. कारण या संकटाच्या काळात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाच्या दयनीय स्थितीमुळे जनता संतप्त होती. बॅनर्जींकडून केंद्रावर केली जाणारी टीकाही जनतेला पटली नाही आणि करोनाच्या बिघडत्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.
तृणमूलच्या आणखी एका नेत्याने म्हटले आहे, की वर्ष 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, करोनाच्या मुद्यावरून ममता सरकारवर जोरदार आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला असून यानंतर एक बहुआयामी रणनीती तयार करण्यात आली आहे.
ही रणनीती लागू करण्यासाठी प्रशासकीय तथा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्ष सशक्त असल्याचे दाखवत आहे, चुकाही सुधारत आहे. तसेच भाजपशीही दोन हात करत आहे. असे झाल्यासच आगामी निवडणुकीत पक्षाला जनतेसमोर जाताना अडचण येणार नाही, असे या नेत्याने स्पष्ट केले आहे.