नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघात कधी पुनरागमन करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले असले तरी त्याचा जीवलग मित्र व फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल याने त्याची जागा आजही आरक्षित आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच धोनी लवकरात लवकर संघात परत येईल, आम्हाला सगळ्यांनाच त्याची उणीव जाणवते, असेही मत व्यक्त केले आहे.
धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली असली तरीही भारतीय संघ ज्या बसने हॉटेलमधून मैदानावर येताना प्रवास करतो त्या बसमध्ये धोनी माझ्याच शेजारच्या आसनावर बसायचा. आजही ते आसन मी आरक्षित ठेवतो. अन्य कोणत्याही खेळाडूला त्या जागी बसू देत नाही. ती जागा धोनीचीच आहे आणि त्याचीच राहणार, असेही चहलने सांगितले.
भारतीय संघात मी पदार्पण केले तेव्हापासूनच धोनीशी मैत्री झाली. त्याचे सल्ले, सामन्याच्या परिस्थितीबाबतचे ज्ञान, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे कमकुवत दुवे हेरण्याची त्याची क्षमता सर्वच विलक्षण आहे. खेळपट्टीवरील फलंदाज कसा खेळतो, त्याला बाद करण्यासाठी कशी गोलंदाजी करायला हवी याबाबत धोनी सातत्याने गोलंदाजांशी चर्चा करतो. खेळाडू नवा असो वा अनुभवी तो प्रत्येकालाच सल्ला देतो आणि त्यानुसारच कामगिरी करण्यासाठी तो आग्रही असतो. मला त्याच्या सल्ल्यांमुळे अनेक सामन्यांत यश मिळाले आहे. कामगिरी सरस झाली नाही तर तो नाराज होतो. मात्र, सामना संपल्यावर अन्य खेळाडूंशी असलेल्या त्याच्या नात्यात फरक करत नाही. जे झाले ते विसरून पुढे यश मिळवा हेच तो सातत्याने सांगतो, असेही चहल म्हणाला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत पराभूत झाल्याने भारतीय संघाचे आव्हान संपले होते. त्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास 8 महिने विश्रांती घेतली होती. त्यावेळी तो निवृत्ती घेणार का संघात पुनरागमन करणार या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक व निवड समीतीनेही धोनीला आयपीएलमध्ये खेळून कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध कर अशी सूचना केली होती. त्यानुसार तो चेन्नई सुपरकिंग संघाच्या सराव सत्रातही सहभागी झाला होता. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने हे सराव सत्र बंद झाले. आता धोनी संघात पुनरागमन कसे करणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
बीसीसीआय व निवडसमिती आता धोनीबाबत काय निर्णय घेणार याबाबत देखील सध्या संभ्रम आहे. खरेतर धोनी संघात नसताना ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्यासह अन्य काही यष्टिरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली होती. मात्र, यांपैकी एकालाही सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच धोनीलाच संघात स्थान द्या अशी मागणीही अनेकांनी केली आहे.
गोलंदाजांचे नुकसान होत आहे…
धोनी संघात असला की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद कसे करता येईल याबाबत व्युहरचना तयार करायचा. त्याबाबत संघातील सर्व गोलंदाजांना अवगतही करायचा. कशी गोलंदाजी करा, त्यानुसार क्षेत्ररक्षण कसे लावा याबाबत त्याचे सल्ले जवळपास 99 टक्के वेळा उपयुक्त ठरले आहेत. आता तो संघात नसल्याने गोलंदाजांचे देखील नुकसान होत आहे, असेही चहलने सांगितले.