संघटनेत निर्माण झालेले मतभेद मिटल्याचाही दावा
पुणे – कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाजाचा विरोध आणि पाठिंबा देण्यावरून निर्माण झालेले मतभेद मिटले असून, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने अखेर त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांशी पाटील यांनी संयुक्त बैठक घेतली. यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ कुलकर्णी, युवा आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय शेकदार उपस्थित होते.
महासंघातर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल जोशी आणि मयुरेश अरगडे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याची अधिकृत घोषणाही यावेळी त्यांनी केली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात ब्राह्मणांच्या आर्थिक विकासासाठी आणि ब्राह्मण समाजाला उद्योग-व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करणे, पौरोहित्य करणाऱ्यांना दरमहा 5,000 रुपये मानधन सुरू करणे आणि ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे ब्राह्मण समाजालाही संरक्षण देणे या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. पाटील यांनी राज्य स्तरावरील प्रमुख नेता या भूमिकेतून या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासक पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले.
तसेच ब्राह्मण समाजाच्या हितासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येतील आणि त्यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊ, असेदेखील स्पष्ट केले. या प्रश्नी डॉ. सचिन पटवर्धन यांनी तोडगा काढण्याबाबत भूमिका बजावल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.