वंदना बर्वे
राहुल गांधी यांच्या हातात पुन्हा एकदा कॉंग्रेसची सूत्रं देण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने 10 ऑगस्टपूर्वी अध्यक्षाची निवड करण्याची नोटीस दिली आहे. यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.
खरं सांगायचं म्हणजे राहुल गांधी यांची ही निवड केवळ औपचारिकता होय. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा असल्या तरी बहुतांश निर्णय हे राहुल गांधी यांच्याकडूनच घेतले जात होते. मात्र, अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ हा पूर्णपणे वेगळा असेल असं कॉंग्रेसमधील काही नेत्यांचं म्हणणं आहे. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना पूर्ण सूट देण्याचे ठरविले आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये कोणताही निर्णय हा फक्त युवराजांचाच राहणार आहे.
सोनिया गांधी यांचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसेल. कार्यकारिणीची निवड, त्यांचे कामकाज सगळं राहुल गांधी ठरविणार. राहुल गांधी आता फार आक्रमक आणि मॅच्युअर राजकारणी झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेला स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असो वा चीनची घुसखोरी प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला धारेवर धरले आहे.
राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली होती तेव्हा वातावरण फार वेगळं होतं. आताचं वातावरण खूप वेगळं आहे. पहिल्या कार्यकाळापूर्वी, अनेक कुविशेषणांनी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं जात होतं. मात्र, आता ही प्रतिमा पूर्णपणे पुसली गेली आहे. आता कुणीही राहुल गांधी यांना आक्षेपार्ह शब्द वापरताना दिसत नाही.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पक्षाच्या नेत्यांनी लाख समजविण्याचा प्रयत्न केला; परंतु राहुल गांधी यांनी राजीनामा परत घेतला नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळातही राहुल गांधी यांनी एकट्याने किल्ला लढविला होता. पक्षाचे मोठमोठ्या दिग्गजांनी स्वतःला आपल्या मतदारसंघात कोंडून घेतले होते. निवडणुकीच्या प्रचारातही मोदी यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत एकाही नेत्याने दाखविली नव्हती. यामुळे व्यथित झालेले राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
याचा अर्थ असा की, ज्यांच्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना भविष्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड ज्यांना म्हटलं जात होतं त्यातील दोन चेहऱ्यांचं पितळ उघडं पडलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपात गेले आहेत आणि सचिन पायलट यांनी राजस्थान सरकारविरुद्ध बंड पुकारलं. यामुळे दुसऱ्या नेत्यांना संधी मिळण्याची वाट मोकळी होईल, असं म्हणायला हरकत नाही. मात्र, राहुल गांधी यांनी भूतकाळातील चुका ध्यानात ठेवून नवीन निर्णय घ्यायला पाहिजे.
अध्यक्षपदाच्या काळात सोनिया गांधी यांनी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. ते म्हणजे पक्ष संघटनेकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. नगरसेवक होण्याची पात्रता नसलेल्यांना आमदारकी मिळाली होती. यामुळे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते दुखावले गेले. त्यांची एवढी उपेक्षा केली गेली की काही पक्ष सोडून गेले आणि काही जणांनी घरी बसण्याचा निर्णय घेतला. यात त्या लोकांचा समावेश होता ज्यांनी अख्खं आयुष्य कॉंग्रेसची सेवा केली. कॉंग्रेसला पुन्हा सामान्यांचा पक्ष बनवायचा असेल तर राहुल गांधी यांना ही चूक आधी दुरूस्त करावी लागणार आहे. निष्ठावंतांना पुन्हा पक्षाशी जोडावे लागेल.
आपला मुकाबला पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्यासारख्या धुरंधरांशी आहे. भारताच्या राजकारणात दोन्ही नेत्यांचा दबदबा आहे. एकेकाळी मोदी यांच्याविरुद्ध दंड थोपटणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनासुद्धा मोदी यांच्या छावणीत आश्रय घेणे सोयीस्कर वाटले. अशा मातब्बर नेत्यांचा सामना करून कॉंग्रेसला यशोशिखरावर पोहोचविण्याचे काम नवीन अध्यक्षांना करायचे आहे.
राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळताच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये सरकार स्थापन केली होती. यातील कर्नाटक आणि मध्य प्रदेश हातून गेले आहे. राजस्थान सरकार अस्वस्थ आहे. यंदा, बिहार विधानसभेची निवडणूक आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशची. अशात पक्षाला मजबूत करण्यासाठी दुखावलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांना जोडावे लागेल. लोकांना भेटावे लागेल. कॉंग्रेसपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा कॉंग्रेसशी जोडायचे असेल तर राहुल गांधी यांना आपल्या कार्यशैलीत बदल करण्याची गरज आहे. तसं बघितलं तर, राहुल गांधी यांच्यात खूप बदल घडून आला आहे.
बोलण्याच्या ओघात काही तरी बोलून जायचे आणि स्वतःची फजिती करून घेणारे राहुल गांधी राहिले नाहीत. आता तोलूनमापून बोलणारे युवराज सगळीकडे बघायला मिळत आहेत. व्यासपीठ आणि लोकांची मने जिंकण्याचे कौशल्य त्यांच्यात बऱ्यापैकी विकसित झाल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येते. मैफल कशी लुटायची याची कला राहुल गांधी यांना आता अवगत होऊ लागली आहे. आणि हाच बदल कॉंग्रेसमध्ये चैतन्याची फुंकर घालण्यासाठी आवश्यक आहे.
सोनिया गांधी अध्यक्षा असताना राहुल गांधी यांना पक्षाचे महासचिव बनविण्यात आले होते. मात्र, सर्व महासचिवांमध्ये त्यांचं पद थोडं भारदस्त वाटावं म्हणून राहुल गांधी यांना “सेक्रेटरी जनरल’ पद देण्यात आलं होतं. अर्थात, सर्व महासचिवांचे बॉस. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात या पदावर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची नेमणूक केली तर कॉंग्रेसला खूप फायदा होऊ शकतो.
प्रियांका गांधी यांच्यात लोकांना इंदिरा गांधी यांची प्रतिमा दिसून येते. मात्र, यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर पक्षासाठी करून घ्यावा लागेल. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशचा प्रभार आहे. मात्र, उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्र, गुजरात यासारख्या राज्यांचं प्रभार दिला गेला तर कॉंग्रेसचं नशीब कसं चमकेल हे कॉंग्रेसलाही कळणार नाही आणि याचा प्रभाव आपोआप उत्तर प्रदेशातही दिसून येईल.