बेंगळुरू – ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतानाच करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा पुढे गेली. त्यावेळी खूप निराश झाले होते. मात्र, आता नव्या जोमाने सराव करत असून टोकियोत सुवर्णयश मिळविणारच, असा विश्वास भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.
2012 साली झालेल्या चायना ओपन स्पर्धेत त्यावेळची ऑलिम्पिक पदक विजेती ली झोरेयूला पराभूत केल्यानंतर खरेतर माझ्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. तोपर्यंत देशात कोणीही माझी फारशी दखल घेतली नव्हती. मात्र, त्या एका सामन्यातील विजयाने माझे नाव देशभरात गाजले. त्यावेळी खूप आनंद झाला होता. तेव्हापासूनच मला व्यावसायिक स्पर्धेत कसे खेळायचे व प्रतिस्पर्धी खेळाडूवर कसे दडपण टाकायचे हे लक्षात आले. अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. माझे प्रशिक्षक विमलकुमार व सध्याचे प्रशिक्षक व माजी ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पी. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनामुळे मला या खेळात वर्चस्व राखण्याची संधी मिळाली. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरले याचाही आनंद आहे, अशा शब्दांत सिंधूने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मार्चपासून देशात करोनाचा धोका वाढल्याने घरातच बसावे लागले. अनेक स्पर्धा रद्द झाल्या तसेच सरावही बंद झाला. हा वेळ कसा व्यतीत करायचा असा प्रश्न पडला होता. सातत्याने स्पर्धांमुळे घराबाहेर असल्याने घरात बसून राहण्याची सवयच नव्हती. त्यामुळे खूप निराशा येत होती. अखेर स्वयंपाकघरात विविध पदार्थ बनवायला शिकण्यास सुरुवात केली व संपूर्ण मानसिकताच बदलून गेली. आता निराशेतून बाहेर पडले असून सरावही सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी मेहनत घेत टोकियो पदकाचे स्वप्न पूर्ण करणारच, असा विश्वासही सिंधूने व्यक्त केला.