नवी दिल्ली – देशात सूर्यफुलाचे उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे. सूर्यफुलाचे उत्पादन वाढावे याकरिता केंद्र सरकार योजना तयार करीत आहे. यासाठी सर्व राज्य सरकारबरोबर चर्चा करण्यात येत आहे असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
याअगोदर देशात डाळींचा तुटवडा कमी करण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पाम तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तशाच प्रकारे सूर्यफुलाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू आणि इतर राज्याच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपशिलात चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यानी केंद्रीय कृषी मंत्रालयाला सूर्यफुलाचे उत्पादन कशा प्रकारे वाढविता येईल यासंदर्भात एक आराखडा सादर केला आहे.
सध्या भारतामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जाते. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगडमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उत्तर प्रदेशामध्ये मोहरीचे उत्पादन यशस्वीरीत्या घेण्यात आले आहे. अशाच प्रकारे सुक्ष्म जलसिंचनाचा वापर करून उत्तर प्रदेशामध्ये सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
कर्नाटकमध्ये रब्बीच्या हंगामात सूर्यफुलाचे उत्पादन देण्यासंदर्भात हालचाली चालू आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. भारत या देशातून सूर्यफूल तेलाची आयात करीत होता. मात्र या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्यामुळे सूर्यफूल तेलाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आगामी काळामध्ये इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही अशा पद्धतीने सुर्यफुलाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तोमर यांनी सांगितले. भारतामध्ये सूर्यफूल घेण्यासाठी आवश्यक वातावरण आहे मात्र इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सूर्यफुलाचे उत्पादन कमी प्रमाणात घेतले जाते. आता हे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.