वाई, (प्रतिनिधी)- ऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादनाचे हमी देणारे, सर्वच ऊस उत्पादकांचे नगदी पिक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लागण आणि खोडवा ऊस पिकांचे पाणी व अन्नद्रव्याने उत्तम नियोजन शेतकऱ्यांनी केले तर ऊसाचे शंभर टन उत्पादन शक्य आहे. ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा योग्य वापर करून ऊसाचे उत्पादन वाढविता येते, असे जैन इरिगेशन सिस्टीम प्रा. ली ऊस तज्ज्ञ विजय माळी यांनी केले.
शहाबाग (ता. वाई ) ग्रामपंचायत, वैभव ट्रेडर्स आणि जैन इरिगेशन सिस्टीम यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय व्यवस्थापक हरी देशमुख, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक शिवाजी जमदाडे, सरपंच सागर जमदाडे, एम. बी. बनसोडे, दत्तात्रय जगताप, कृषीमित्र अरुण आदलिंगे, सौ. सुजाता जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. माळी म्हणाले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे, यावर्षी पाण्याचाही तुटवडा भासणार आहे.
शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि खताचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तरच ऊसाचे उत्पादन वाढविणे शक्य आहे. कार्यक्रमासाठी विश्वनाथ पावगी, बापू राजपुरे, नामदेव बोधले, संजय जमदाडे, सुभाष पाटील, भगवान जगताप, राजाराम जगताप, दत्तात्रय जाधव आणि पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
त्रिसुत्रीचा वापर करावा
कृषीमित्र अरुण आदलिंगे म्हणाले, शेतकऱ्यांनी ‘त्रिसूत्री’ चा वापर करावा. ऊस उत्पादन वाढीसाठी निरोगी बियाण्यांची निवड, खतांचे मायक्रो व्यवस्थापन, विद्राव्य खताबरोबर, खते माती आड जातील असे पाहावे. बदलत्या पर्जन्यवृष्टीनुसार ठिबक सिंचनाला पर्याय नाही या ‘त्रिसूत्री’ चा ऊस उत्पादकांनी वापर केल्यास २० ते २५ टक्के उत्पादनात वाढ होईल.