जयपूर – राजस्थानच्या राजकारणात ‘रावण’वरून खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना ‘राजकारणातील रावण’ म्हटल्याबद्दल चित्तोडगडमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे स्थानिक नेते सुरेंद्र सिंह जदवत यांनी शेखावत यांच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. गुरूवारी शेखावत यांनी चित्तौडगड येथील भाजपच्या जनआक्रोश रॅलीत भाषणाच्या शेवटी रामराज्याची शपथ घेण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात वक्तव्य केले होते.
या प्रकरणी गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 143, 153-ए (गटांमधील वैर वाढवणे), 295-ए (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम 500 आणि 504 (शांतता भंग करणे) आणि 511 आणि 505 (2) यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी चित्तौडगड येथील भाजपच्या जन आक्रोश रॅलीत भाषणाच्या शेवटी म्हटले की, राजस्थानातील राजकारणातील रावण अशोक गेहलोतना संपवायचे असेल तर हात वर करा आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी लढा.
शेखावत यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पलटवार करत मी रावण आहे, तर तुम्ही राम होऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत करा, असे म्हटले आहे.
या वक्तव्याद्वारे गेहलोत यांनी शेखावत यांच्या संजीवनी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्यात कथित सहभागाकडे लक्ष वेधले. त्याचवेळी गेहलोत यांनी हनुमानगडच्या रावतसरमध्ये म्हटले होते की, केंद्रीय मंत्र्याचे मित्र या घोटाळ्यात तुरुंगात आहेत आणि त्यांनाही तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री दोषी असतील तर त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना बडतर्फ करावे, असे ते म्हणाले होते.