वाराणसी – एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळण्यात आल्याच्या प्रकारावर बनारस हिंदु विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक एस. सी. लखोटिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, जैविक उत्क्रांती ही एक मूलभूत प्रक्रिया आहे आणि ती समजून घेणे जीवशास्त्र अभ्यासकांसाठी आवश्यक आहे. 1,800 हून अधिक शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि शिक्षकांनी नुकतेच एक खुले पत्र लिहून ‘जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत’ हा धडा इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की डार्विनचा सिद्धांत कायमचा काढून टाकला जात आहे. जैविक उत्क्रांती ही एक मूलभूत प्रक्रिया आहे आणि ती समजून घेणे लोकांसाठी महत्त्वाचे आहे. वैज्ञानिकदृष्ट्या काय योग्य आहे हे जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार आहे. तरीही एनसीईआरटी हे का करीत आहे याची आम्हाला कल्पना नाही.
तत्पूर्वी शनिवारी, शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी एनसीईआरटीच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की,इयत्ता 10वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकल्याबद्दल दिशाभुल केली जात आहे. कोविड-19 मुळे मुलावरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी अभ्यासक्रमांचे तर्कशुद्धीकरण सुरू होते. त्यातून पुस्तकातून काही विषय वगळले आहेत. जर मुलाला अभ्यास करायचा असेल, तर डार्विनचा सिद्धांत सर्व वेबसाइटवर उपलब्ध आहे. इयत्ता 12वीमध्ये डार्विनची थिअरी समाविष्ट आहे. त्यामुळे हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्या विषयी दिशाभुल केली जाऊ नये.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसच, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि आयआयटी यांसारख्या नामांकित संस्थांमधील शास्त्रज्ञांसह 1,800 हून अधिक शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि शिक्षकांनी अलीकडेच एक खुले पत्र लिहून एनसीआरटीच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.