चेन्नई – इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील घटक पक्षांना अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. त्या पक्षांचे नेते परराज्यात त्या आघाडीला एकही मत मिळवून देऊ शकत नाहीत, अशी खिल्ली केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पियूष गोयल यांनी सोमवारी उडवली.
आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया फारसे आव्हान उभे करू शकणार नाही, असे राजकीय चित्र रंगवण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते.
त्यातून त्या पक्षाचे नेते इंडियाला फारसे महत्व देण्याचे टाळताना दिसतात. गोयल यांनी चेन्नईत पत्रकारांशी बोलताना मांडलेल्या भूमिकेतूनही त्याचा प्रत्यय आला. इंडिया केवळ आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) नवा अवतार आहे.
त्या आघाडीतील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसारखे नेते इतरांच्या खात्यात एक मतही जमा करू शकत नाहीत.
तृणमूल कॉंग्रेसला स्वत:च्याच राज्यात (पश्चिम बंगाल) झगडावे लागत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष दोन अंकी मजलही मारू शकणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष, आप स्वत:च्याच अस्तित्वासाठी झगडत आहेत.
तेही एकही अतिरिक्त मत मिळवून देऊ शकत नाहीत. तामीळनाडूत सत्तेवर असणारा द्रमुक हा पक्ष कॉंग्रेसला इतर कुठल्या राज्यात मतं मिळवून देऊ शकतो, अशी विचारणा गोयल यांनी केली.