मुंबई – दहावीचा भूगोलाचा पेपर आणि नववी व अकरावीची परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द होणार कि नाही? अशा संभ्रमात विद्यार्थी आहेत. मात्र, यावर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत म्हणाले कि, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच परीक्षांसंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल. त्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घेव्या याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.