नवी दिल्ली – कॅनडाचे पंतप्रधान जस्टी ट्रुडेऊ यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केल्यानंतर भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाचारण करून त्यांच्याकडे या वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली होती.
तथापि भारताची ही नाराजी धुडकाऊन लावत कॅनडाच्या पंतप्रधानांनी आज पुन्हा भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्यांनी या आधी जे वक्तव्य केले होते त्याचाच त्यांनी आज पुनरूच्चार करीत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपल्या मागण्यांसाठी शांततेने आणि लोकशाहीं मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील, मग अशा प्रकारचे आंदोलन जगाच्या पाठीवर कोठेही असो. तथापि भारताने चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा जो प्रयत्न हाती घेतला आहे त्याने आम्ही समाधानी आहोत अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भारतातील आंदोलनाला पाठिंबा देणारी वक्तव्य केल्यास त्याचा भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा भारताने दिला आहे. त्या विषयी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा या आंदोलनाला पाठिंबा देणारे वक्तव्य करीत भारताच्या या इशाऱ्याला फार महत्व देण्याचे टाळले.
भारताने शुक्रवारीच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना विदेश मंत्रालयात बोलावून पंतप्रधानांच्या या वक्तव्याविषयीची भारताची नाराजी त्यांना कळवली होती.