नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन हाताळणीवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेअू यांनी भारत सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत असल्याचेच हे लक्षण मानले गेले आहे. त्यामुळे त्यावर भारत सरकारनेही तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनाविषयी कॅनडाच्या पंतप्रधानांना चुकीची माहिती मिळाली असावी म्हणून त्यांनी ही विधाने केली असावीत, असे विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
ट्रुडेअु यांची अशा प्रकारची विधाने म्हणजे लोकशाहीवादी देशाच्या अंतर्गत कारभारातील हस्तक्षेप आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचे जाहीर समर्थनही केले असून आपल्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी आम्हीही खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या हिताची तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही आम्हाला काळजी वाटत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांविषयी आम्ही भारत सरकारकडेही दाद मागितली आहे, असेही कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या संबंधात एखाद्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रथमच अशा स्वरूपाची विधाने करीत आंदोलकांना पाठिंबा दिल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे.