सातारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. भाजपचे सरकार लवकरच सत्तेवर येणार आहे, असे भाकीत खा. उदयनराजे भोसले यांनी वर्तवले.
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
ते म्हणाले, विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये सहाही जागांवर भाजपलाच प्रचंड मतांनी विजय मिळेल. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने कधीही राजकीय पक्ष एकत्र आले नव्हते.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले तरी ते कायमस्वरूपी एकत्र राहत नाहीत. हेतू साध्य झाल्यानंतर ते आपापल्या मार्गांनी निघून जातील. भाजप हा एकच विचार असलेला पक्ष आहे.
या पक्षाची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे निश्चित आहेत. ठाकरे सरकारने एका वर्षात काय केले, ते त्यांनी व्यासपीठावर येऊन राज्यातील लोकांना सांगितले पाहिजे.