पुणे – आरोग्यदायी जीवनासाठी चालणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांकडून नेहमी सांगण्यात येते. मात्र, पदपथांवरील वाढती अतिक्रमणे पाहता, चालायचे कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. दैनंदिन आयुष्यात रस्त्यावरून चालणे जिकीरीचे होत असून, वाहने आणि अतिक्रमणे यांचा सामना करत नागरिक जीव मुठीत घेऊन चालत असतात. त्यामुळे स्मार्ट पुण्यात मुक्तपणे चालता येईल का? असा प्रश्न नागरिक करत आहे.
नागरिकांना रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून चालावे लागू नये, यासाठी पदपथ तयार केले. मागील काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने पदपथांची पुनर्रचना केली आणि पदपथांचे रूंदीकरण झाले. मात्र या पदपथांच्या रूंदीनुसार पदपथावरील पार्किंग, अतिक्रमणांचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे नागरिकांसाठी तयार केलेल्या या “विशेष रस्त्याचा’ वापर पादचाऱ्यांना करणे अवघड झाले आहे. परिणामी, अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, सिंहगड रस्ता, कॉंग्रेस भवन समोरिल रस्ता आदी रहदारीच्या आणि स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे सुरू असणाऱ्या रस्त्यांसह मंडई, शनिपार चौक, कॅम्प आदी रस्त्यांवरील पदपथांची भाजी, पुस्तक, दागिने, कपडे आणि खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते, पानटपऱ्या, पार्किंग आणि पीएमपीच्या थांब्यांमुळे “कोंडी’ झाली आहे. त्यामुळे चालण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
परिणामी, नागरिकांना रस्त्यावरून चालावे आहे. परंतु, वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पदपथाची रूंदी नेमकी कशासाठी वाढवली आहे आणि पदपथाचा उपयोग नक्की कोणी करायचा, असा सवाल आहे.