दोन दिवस गावाकडे आलो होतो. अर्थात, तुम्हाला प्रश्न पडला असेलच पण पत्रकार असल्यामुळे मला जिल्ह्यात सर्वत्र पास होता. तसा फोटोग्राफीचाही नाद असल्यामुळे सकाळीच कॅमेरा लावून गावात निघालो. थोडं गावाबाहेर पडल्यावर जंगल सदृश सुरुवात झाली तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे मंजुळ आवाज होते. मग तेथे काही फोटो काढले.
येताना नदीतिरी पाणवठा होता. गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी तेथे आल्या होत्या. तेथील पाण्यातील पक्ष्यांचे फोटो काढू लागलो. माझ्या मित्राची पत्नी सविताही पाणवठ्यावर आली होती. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, पण होळीसाठी गावी आली आणि लॉकडाऊनमध्ये अडकली. तिला पाहतात एक जण म्हणाली की, “”सासू नाही आली का? तुला कशाला पाठवले. आता तुला काळजी घ्यायला हवी, आम्हाला कळलयं”. त्यावर ती लाजत म्हणाली, “”सासुबाई येताहेत मागून”.
इतक्यात राधाबाई म्हणाल्या, “”माझ्या पुतणीला मुलगी होऊन झाले बारा दिवस. आज बारसे सासरीच. मला म्हणत होते, काय नाव ठेवायचे? सुचवा. मी म्हणाले, हल्ली तुम्ही काहीही नावं ठेवता. बघा तुम्हीच”. इतक्यात सविता मजेत बोलली, “”करोना ठेवा”. त्या बाया खोखो हसल्या. तेवढ्यात सविताची सासूही आली. इंदिराबाई रागाने सविताला म्हणाल्या, “”तुला आता होईलच ना? पोर झाली तर ठेव हेच नावं. काय बाई सांगते एक एक”. सविताची सासूही म्हणाली, “”काय बोललाना काय बी वाटत नाय? तुम्हा नवीन पोरांना काय पोचच नाय, जा आता घरी च्या ठेवाया. मी येते मागून”.
मी घरी येऊन आंघोळ वगैरे केली. जेवणानंतर थोडा आराम केला. पाच वाजता सरपंचांनी चावडी बोलावली होती म्हणून गेलो. व्यवस्थित अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था होती. सर्वजण मास्क किंवा रुमाल लावूनच आले होते. मी गावात आल्यामुळे माझ्याकडे निवेदन देणार होते तहसीलदारांना द्यायला. बऱ्याच सैनिकांना व शिक्षकांना पेन्शन मिळते. पण तालुक्यात जाणे कठीण झाल्यामुळे किमान तालुक्यातून गावची एसटी पुन्हा सुरू करावी. त्यावर सदा म्हणाला की, “”बॅंकेत कशाला जायला पाहिजे एटीएममधून काढा?” त्यावर गणा मास्तर म्हणाले, “”अरे राजा येथे एटीएम नाही म्हणून तर. गावातून तालुक्यात जायला तर मिळावे तेथून आमी काढू एटीएममधून”.
शेतकरी वर्गातील एक दोन जण म्हणाले, “”आमचा माल तालुक्यात नेण्या एसटीतून परवानगी मिळावी”. तसे अर्जात लिहिले. आणखी एक जण म्हणाला, “”रुग्णांनाही जाण्याकरता एसटी सुरू करावी जेणेकरून तालुक्यात डॉक्टरांकडे जातील”. सलूनवाला रघू व पानपट्टीवाला बबलू म्हणाले, “”आमची दुकाने सुरू करायला परवानगी द्या”. सर्व लिहून झाले. मिठाईवाला लालचंद सर्वांसाठी कटिंग घेऊन आला.
चहा झाला एवढ्यात गुरव ओरडत आला “”तेव्हरं गावदेवी मंदिर उघडायचं लिवा”. ते लिहून माझ्याकडे तो कागद दिला. आता उद्या तहसीलात जमा करतो.
– उत्तम पिंगळे