राहुरी -श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून किसान-कनेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी’ ची स्थापना केली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतमाल शहरवासियांना थेट पद्धतीने पुरवण्यासाठी योजना आखली आहे. अहमदनगर, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमधून कंपनीचे काम सुरु झाले असून लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्रीचा प्रश्न गंभीर झाला असताना या उपक्रमामुळे भाजीपाला उत्पादकांना दिलासा मिळत आहे.
आजपर्यंत 57 लाख रुपयांचा 157 मे. टन भाजीपाला कंपनीने खरेदी केला आहे.
श्रीरामपूर एम. आय. डी. सी. येथे उभारलेल्या फळे व भाजीपाला संकलन व पॅकिंग केंद्रामधून दिनांक 7 एप्रिलपासून मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील रहिवासियांना थेट त्यांच्या दारात हा शेतमाल देण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी नवी मुंबईतील नेरूळ येथे कंपनीने कार्यालय सुरु केले असून ग्राहकांची ऑर्डर घेणे व त्यांच्यापर्यंत माल पुरविणे सुरु झाले आहे. कोविड-19 च्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर व संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात कंपनीने सहा महिन्यांपासून मुंबई व ठाणे येथील सर्व उपनगरे व हाऊसिंग सोसायट्यांच्या दारोदारी जाऊन रहिवाशांची नाव नोंदणी केली व त्यांच्या गरजा लिहून घेतल्या तसेच तीन तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्याकडील फळे व भाजीपाल्याची माहिती संकलित केली.
ग्राहकाची फोनवर बोलूनच ऑर्डर घेणे शक्य होत आहे. 17 एप्रिल पासून राहाता तालुक्यातील प्रवरा फळे व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेच्या खडकेवाके, येथील प्रक्रिया केंद्रातही फळे व भाजीपाला संकलन, स्वच्छता, ग्रेडीग, वर्गवारी व पॅकिंग असे दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले आहे . शेतकऱ्याकडून थेट फळे व भाजीपाला खरेदी केली जात असून त्यांचे आठवडा पेमेंट थेट त्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर जाता येत नसताना उत्पादक ते थेट ग्राहक अशी ही साखळी आहे.
शिवाय विक्रीचे दर हे सामान्य बाजार मुल्यानुसारच ठेवले आहेत. किसान कनेक्टमार्फत भाजीपाला उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. करार पद्धतीने शेती करण्यावर भर असेल. उत्पादकांना योग्य भाव व ग्राहकांना माफक किंमतीत थेट घरपोच सुविधा देणे हा मुख्य उद्देश किसान-कनेक्टचा असल्याचे या प्रकल्पाचे संस्थापक सारंगधर निर्मळ यांनी सांगितले.
या उपक्रमात आतापर्यंत श्रीरामपूर व मुंबई येथे 100 महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला असून पुढील टप्यात अधिक रोजगार उपलब्ध होतील असे संचालक किशोर निर्मळ व कंपनीचे सी.ई.ओ विवेक निर्मळ यांनी सांगितले.