पुणे: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाचे नाव बदलून “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ करण्याचा प्रस्ताव नुकताच सादर केला होता. या प्रस्तावाला राज्याच्या मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली असून, आता हा विभाग “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ या नावाने ओळखला जाईल.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज(दि.9) हा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणात होत असलेले बदल आणि त्याचा सामान्य माणसांवर होत असलेला परिणाम या सगळ्यांची दखल घेत हा मोठा बदल केल्याची चर्चा आहे.
पाच जून रोजी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पर्यावरण विभागाकडून विभागाचे नाव बदलणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल असेही सांगण्यात आले होते.
त्यानुसार मंग़ळवारी राज्या मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, विभागाचे नाव बदलण्यास मंत्री मंडळातर्फे मंजूरी देण्यात आली. या बदलामुळे आता पर्यावरण विभागाचं कार्यक्षेत्र वाढणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वतावरणाच्या बदलाचा अभ्यास आणि त्याचा परिणाम यावर मोठा प्रकल्प राबविण्याची त्यांची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे.