आयुष्यात काही तरी केले पाहिजे, ही उर्मी वृषाली मुळे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वडलांच्या प्रेरणेमुळे काही करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या मनात लहानपणापासूनच जागी होती. सासरच्या कुटुंबातील गारमेंट दुकानाच्या व्यवसायला त्या मदत करत गेल्या. परंतु,
पुढील काळात घरी राहूनच काही व्यवसाय त्या करतील, असे त्यांनाही वाटले नव्हते. पण घरात राहूनच केटरिंग आणि विविध खाद्यपदार्थ तयार करण्याच्या त्यांचा व्यवसायाचा जम बसत गेला. त्यांची स्वतःची ओळख निर्माण झालीच.
त्याशिवाय काही महिलांना त्यांच्यामुळे रोजगारही मिळू लागला आहे. पाककृती करण्याच्या कौशल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळेच दिवाळीसारख्या सणासुदीतही त्यांच्या हातच्या पदार्थाची चव परिसरातील अनेकांच्या जिभेवर रेंगाळणार आहे.
मोठ्या कष्टाने व मेहनतीने मोशी (पुणे) येथे राहणाऱ्या वृषाली मुळे यांनी आपली ओळख निर्माण केली. खरं तरं अशी धडपड करण्याची गरज त्यांना नव्हती. मात्र, काही करण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे वडील विवेक मुळे नगर जिल्ह्यातील मोहटादेवीचे पुजारी. त्यांना वृषाली यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. तू जे काही करशील, त्याच्यात एक्स्पर्ट होशील, जे करशील ते
चांगलेच करशील, असे वडील त्यांना नेहमीच म्हणायचे. त्यांचा हे शब्द आठवले की वृषाली गहिवरून जातात.
आणि चांगले काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती त्यांना पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते. आईवडलांचा पाठिंबा मिळाला.
तशीच माणसे सासरीही भेटली. पतीसह सर्वजण प्रोत्साहन देत राहिले. सासरचे गारमेंटचे दुकान 11 वर्षांपासून आहे.
त्या दुकानात वृषाली काम करायच्या. पण जुळ्या मुली झाल्या. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांचे दुकानातील
काम थांबले. मुलींसाठी घरी राहिल्या. आता मुली पाच वर्षांच्या आहेत.
त्यांच्यासाठी घरी थांबायचे पण घरी बसून काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. त्यांच्या दुकानातील कामगारांना जेवणाच्या डब्याची गरज भासली. त्यावेळी वृषाली यांनी त्याना 15 दिवस डबा करून दिला. त्यातूनच घरात राहून व्यवसाय करण्याच्या त्यांच्या कल्पनेला पाच- सहा महिन्यांपूर्वीपासून मूर्त स्वरूप मिळाले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या चवीचे कौतुक होऊ लागले. लोकांना खाद्यपदार्थ आवडतात हे लक्षात आल्यावर यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे, असे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. त्यांना परिसरातून प्रतिसादही मिळू लागला.
आता सध्या रोज सरासरी सकाळ संध्याकाळ तीस डबे त्या तयार करतात. त्याशिवाय ऐनवेळी येणाऱ्या
ऑर्डर्स त्या घेतात. दिवाळीसारख्या सणानिमित्ताने वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून त्या विक्री करतात. सुरवातीचे
दोन महिने त्या एकटीनेच सर्व काम करायच्या. पण आता व्याप वाढल्याने त्यांना महिलांची मदत घ्यावी लागत आहे.
रोजच्या कामासाठी एक काकू त्यांना मदत करतात. अधिक ऑर्डर्स असतील त्यावेळी आणखी महिलांची मदत त्यांना घ्यावी लागते. सकाळी लवकर उठायचे. पहिला डबा पावणेआठला द्यायचा असतो. त्यानंतर वेळापत्रकानुसार सकाळपासून रात्रीपर्यंतचे डबे देण्यासाठी त्यांना सतत कामात व्यस्त राहवे लागते. घरकाम करून मुलींचे सारे करणे, त्यांना शाळेत सोडणे, व्यवसायासाठी लागणारा माल मोशी मार्केटमदून तर कधी भोसरी, कधी पिंपरी येथे जाऊन आणणे, अशा घरातील आणि बाहरेच्या साऱ्या गोष्टींची जबाबदारी त्या नेटाने पेलतात. कधी कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर्स मिळतात.
त्यावेळी अधिक काम करावे लागते. पाच दहा डब्यांपासून सुरू झालेले काम आता 150 डबे देण्यापर्यंत पोहचले आहे. एकदा त्या मुलींचे शाळेत प्रवेश घेण्यासाठी निघाल्या. जाताना एक डबाही पोच करायचा होता. ही सारी धावपळ पाहून रिक्षावाले काकांनी त्यांना माणदेशीच्या सुधा खाडे यांना भेटण्यास सांगितले. त्यावेळपासून माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्क झाला. माणदेशीच्या खाडे, धनश्री, दीपाली यांच्यामुळे व्यवसायाला आणखी वेगळी दिशा मिळत गेली. मार्केटिंग, मालाचे पॅकेजिंग, अकाउंटस, डीजिटस प्लॅटफॉर्म अशा अनेक गोष्टी माणदेशी फाउंडेशनकडून शिकण्यास मिळाल्या. प्रदर्शनात पुरणपोळी- आमटी, मिसळ- पाव, बेसन लाडू अशा पदार्थांचा स्टॉल मांडण्याची संधी मिळाली.
ओळखी वाढत गेल्या. मागणी वाढत गेली तसा पुरवठा त्या करू लागल्या. त्यांच्या पुर्णान्न फूडस् या व्यवसायाने गती घेतली. आता त्यांना व्यवसायासाटी नवीन जागा घ्यायची आहे. चार पाच महिलांना काम देऊन त्यांना रोजगार द्यायचा आहे. जे काही करशील ते आत्मविश्वासाने कर, हे त्यांच्या वडलांचे शब्द त्यांच्या कानात घुमत असतात. या शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्यासाठी त्यांना माणदेशीचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे वृषाली जिद्दीने कार्यरत आहेत. एखाद्या महिलेने ठरविले तर ती घर सांभाळून आपल्या आयुष्याला वेगळे वळण देऊ शकते. तिचे स्वतंत्र अस्तित्त्व ती निर्माण करते. स्वतःबरोबर ती इतर महिलांनाही स्वतःच्या पायावर उभी करू शकते. वृषाली यांनी हे साध्य केले आहे. म्हणूनच त्यांच्या हाताची चव आजूबाजूच्या अनेकांच्या जिभेवर रेंगाळते आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांची आणि कामाची दरवळ सर्वत्र पसरू लागली आहे.