स्वदेशी वस्तूंना प्राधान्य दिले, तर विक्री वाढेल
पुणे -“खादी विकत घ्या, त्याचा वापरा करा आणि भेट म्हणूनही द्या’ असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. “प्रत्येकाने स्वदेशीच वस्तू वापरल्या पाहिजेत, त्यामुळे देशातील उद्योगाला चालना मिळेल,’ असेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाटील यांनी शनिवारी कर्वे रस्त्यावरील “गांधी खादी भांडार’ला भेट दिली. त्यावेळी दुकानातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर खादी कपड्यांची खरेदी केल्यानंतर पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गांधी खादी भांडारच्या सौ. वृषाली हर्षद गांधी, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, उद्योजक समीर पाटील, भाजप आयटी सेलच्या संयोजक प्रमुख कल्याणी खर्डेकर, रामदास गावडे, नवनाथ जाधव यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
“मी नेहमीच खादीचे शर्ट वापरतो,’ असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, “जगातील 182 देशांतील 20 देश विकसित आहेत. तर अन्य देश हे अविकसित आहेत. आपण स्वदेशी वस्तूंना प्राधान्य दिले, तर विक्री वाढेल. त्याचबरोबर गावां-गावांमधील उद्योगांना प्राधान्य मिळेल आणि आर्थिक व्यवस्था सुधारेल.’