प्राथमिक शाळेत नोकरी लागल्यानंतर कीर्तीचा परिचय सर्वांना करून देण्यासाठी मुख्याध्यापिका बाईंनी पालक सभेचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका बाईंनी कीर्तीची ओळख करून दिली, मग कीर्तीला चार शब्द बोलायची संधी दिली. कीर्तीने प्रथम देवी सरस्वतीला वंदन करून मुख्याध्यापिका बाईंना नमस्कार केला आणि उपस्थित पालक आणि शिक्षकांना नमस्कार केला आणि मग तिने पालक सभेत पालकांसमोर सुंदर विचार व्यक्त केले.
काही वर्षांनंतर कीर्तीला मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळाला तेव्हा तिने शाळेतील विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर सर्वांचे आभार मानताना माजी मुख्याध्यापिकांचा गौरव करून त्यांचा आशीर्वाद घेतला तर आपल्या सासू-सासऱ्यांसह आपल्या पतीने आणि लाडक्या लेकीनी दिलेली साथीने मी आजवर इथपर्यंत पोचू शकले.
आदर्श मुख्याध्यापिका म्हणूनच आदर्श शाळा अशा पुरस्काराने तिला आंतरशालेय प्राथमिक शालेय समितीतर्फे सन्मानित करण्यात आले होते.तिने लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला शिवाय ती राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल तिला गौरविण्यात आले. ते उपक्रम असे होते, जूनमधे शाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी ती शिक्षकांची मीटिंग घेत असे.
त्यात वर्षभराचा अभ्यास, परीक्षा आणि त्या व्यतिरिक्त इतर उपक्रम कशाप्रकारे राबवले जातील? शालेय आणि आंतरशालेय स्पर्धांची तयारी आधीपासूनच करण्यावर भर देणे, वर्गाबरोबर शाळेच्या आवारातील स्वच्छतेच्या जागरूकते संबंधी मुलांना जाणीव करून देणे, तर दर दोन दिवसांनी मुलांना घरी किंवा शेजारी किंवा सभोवताली काय चांगले काम केलेत ते वहीत लिहून आणायला सांगणे, त्याचबरोबर छोटीशी गोष्ट त्यांच्याकडून लिहून घेणे.
हाही उपक्रम दरवर्षीप्रमाणे हाती घ्यायचा आणि चांगल्या गोष्टी एकत्र करून त्याची पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या प्रती आपल्या शाळेतील मुलांसह इतर शाळेतील मुलांनाही दरवर्षी प्रमाणे भेट म्हणून दिली जावीत असे सांगायची. ग्रामीण शाळांमध्ये पुस्तिका वाटप करण्याची जबाबदारी ती स्वत:वर घेत असे. या सर्व उपक्रमांमुळे तर ती सन्मान करण्यास लायक होती हे लक्षात येते.
अशी ही प्राथमिक शाळेसाठी झटणारी मुख्याध्यापिका आज मात्र एवढासा चेहरा करून बसली होती. गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या करोना महामारीमुळे तिची मुले शाळेपासून दुरावली होती. गेल्या वर्षीचा गुढीपाडवा, दसरा, यावर्षीचा गुढीपाडवा हे सण पाटीपूजनाशिवाय गेले. लहान लहान निरागस मुलांनी ऑनलाइन पाटीपूजन केले. शाळा कशी असते, हे सुद्धा अनुभवता आले नाही. पहिली-दुसरीच्या मुलांना ऑनलाइन शाळा झेपत नव्हती हे कळतच होते.
तर तिसरी-चौथीतील मुले अभ्यासापेक्षा इतर कलाकुसर दाखवण्यात रस घेत होती आणि वर्गशिक्षकांची, कर्मचारी काकांची खूप आठवण येत होती. आम्ही शाळेतच येऊन राहू का? असे डोळ्यांत पाणी आणणारे मेसेजेस पाठवत असत. तर चौथीतील मुले, बाई शाबासकीची थाप पडली नाही, प्रेमाने रागावलात पण नाहीत. ऑनलाइन गोष्टींचा कंटाळा आला आहे, असे भावूक मेसेजेस पाठवत होती.
अशीच अवस्था सगळ्या शाळेची झाली होती. अगदी रिक्षावाले काका, व्हॅनवाले काकांचे मेसेजेस तर आणखीनच वेगळे होते. मुलांना शाळेतच राहू देत आम्ही पण तिथेच राहतो. मुलांना शाळेतच गोल चक्कर मारून आणतो. त्यांचा चिवचिवाट गेले कित्येक महिने ऐकलाच नाही. हे वाचून सारेजण हेलावून जात होते.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कीर्ती, काही शिक्षिका आणि भैय्याजी शाळेत आले होते. अर्थात नियम पाळूनच. पण नि:स्तब्ध झालेली शाळा पाहून अगदी झाडेसुद्धा त्या भयाण शांततेत सामील झाल्यासारखी दिसत होती. कीर्ती आणि हजर असलेल्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले. मुलाबाळांविना शाळामाता पोरकी दिसत होती. गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत गुढी न उभारता कीर्ती शाळेतील माळीकाकांच्या हस्ते वृक्षांची पूजा करवून घेत असे.
मग सारी शाळा वृक्षांना आणि शाळामातेला नमस्कार करत. पण गेल्यावर्षी पासून हे सुख, हा आनंद हरवला होता. कोणी काहीच न बोलता मूकपणे आले तसे निघून गेले. कीर्तीने मागे वळून पाहिले तर शाळा म्हणजे काय याबद्दल शाळेच्या वर्धापनाच्या दिवशी तिने एक शिक्षिका या नात्याने सुंदर स्फुट लिहिले होते. त्यावेळी असणाऱ्या मुख्याध्यापिका बाईंनी हे स्फुट मोठ्या अक्षरांमध्ये लिहून त्याची सुंदर फ्रेम बनवून घेऊन शाळेच्या भिंतीवर लावली होती. या फ्रेमच्या सभोवताली शाळामाता, वह्या, पुस्तके आणि त्याचबरोबरीने वृक्ष-वल्लरींची, चित्रे काढली होती.
फ्रेम आणि फ्रेमच्या सभोवताली असलेल्या शाळामातेचे चित्र बघून तिला क्षणभर गहिवरून आले. शाळामातेने दोन्ही हात पसरले आहेत आणि येत राहा, असा आशीर्वाद देत आहे असा तिला भास झाला आणि ती शाळेच्या पायरीवर बसून राहिली…
(समाप्त)
सुजाता आ.लेले