राजू शेट्टींनी घेतली खा. उदयनराजेंची भेट
सुदृढ लोकशाहीसाठी मजबूत विरोधकांची आवश्यकता
सातारा – भाजप- शिवसेनेमध्ये सर्वच पक्षांचे नेते जात आहेत. या पार्श्वभूमीवर जनमानसामध्ये स्थान असलेले नेते असा निर्णय घ्यायला लागले तर सर्वसामान्यांच्या आवाजाला वाली कोण, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये जाऊ नये, अशी विनंती खा. उदयनराजेंना केली आहे आणि त्यांनीदेखील तसा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यामध्ये अर्धा तास कमराबंद चर्चा झाली. भेटीनंतर शेट्टी म्हणाले, “”लोकसभेच्या निवडणुकीपासून खा. उदयनराजे यांच्याशी भेट झालेली नव्हती. माझ्या पराभवामुळे त्यांना वाईट वाटले. भेटीमध्ये ईव्हीएमच्याबाबतीत चर्चा झाली. सद्यस्थितीत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत बातम्या येत आहेत. त्यामुळे त्यांना विनंती केली की, सुदृढ लोकशाहीसाठी विरोधक मजबूत असणे गरजेचे आहे. सर्वच नेते भाजप सेनेत जात आहेत. अशावेळी जनतेचा आणि विरोधकांचा आवाज राहिला पाहिजे. सर्वांनी मिळून विरोधी नेत्यांची पोकळी भरून काढायची आहे. महाराष्ट्रातून विरोधात मोजकेच खासदार निवडून आले आहेत. अशा वेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडायची गरज आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली आहे व त्यांनीही तसा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावर ते नाराज आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना पक्षांतर करू नका, असे सांगताना दिसून येत नाहीत, या प्रश्नावर ते म्हणाले, “”सगळ्याच पक्षांबाबतीत असे होत आहे. प्रत्येक नेत्यांमध्ये ईव्हीएम भीती आहे. त्याचबरोबर सत्तेत असणे गरजेचे असल्यामुळे देखील प्रवेश होत आहेत. अशावेळी शरद पवार यांचा राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना आम्ही काय सांगणार,” ईडीचा राजकीय गैरवापर होत असून यापूर्वी साखर कारखानदारांवर कारवाई करण्याची मी केलेल्या मागणीबाबात ईडीने कोणतीही कारवाई केली नाही. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सीबीआयसारख्या यंत्रणेला सापडत नाहीत. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही. परंतु, जे लोक भाजपमध्ये येत नाहीत. त्यांच्यावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते, अशी टीका त्यांनी केली.
त्या टीकेचे वाईट वाटत नाही
एकेकाळचे जीवलग सहकारी ना. सदाभाऊ खोत वारंवार तुमच्यावर टीका करित आहेत. त्याचबरोबर विशेषत: बहुजन शब्दाचा वापर करून तुम्हाला अभिजन ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावर शेट्टी म्हणाले, “मला त्याबाबत वाईट वाटत नाही. कारण, बहुजन शब्दाची व्याख्या खूप निसरडी झाली आहे. अशावेळी बहुजन कोणाला म्हणावे अन वंचित कोणाला म्हणावे, असा प्रश्न निर्माण होतो.’
“मी एकदम निवांत’
विश्रामगृहातील दालनामध्ये राजू शेट्टी यांनी खा. उदयनराजेंना भेटण्यास येताच खा. उदयनराजेंनी शेट्टींना घट्ट मिठ्ठी मारली. त्यानंतर शेट्टी म्हणाले, “राजे कसे आहात,?’ त्यावर खा. उदयनराजे म्हणाले, “मी एकदम निवांत. कारण, साताऱ्यात निवांत शब्दाला आगळेवेगळे महत्व आहे. निवांत हा सातारकरांचा शब्द कोणीही हिरावून घेवू शकत नाही.’ असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला.