बोराटवाडीतील मेळाव्यात समर्थकांचा निर्धार; विरोधकांकडून सुरू आहे दिशाभूल
सातारा – माण – खटाव मतदारसंघात फक्त निवडणुका आल्यावरच अंगात येणाऱ्यांचे काहीही ठरले असले तरी जयाभाऊंनाच पुन्हा आमदार करायचं अस “आमचं पण ठरलयं’, असा सूर आमदार गोरे यांच्या समर्थकांनी बोराटवाडी येथील मेळाव्यात आळवला. आमचा पक्षच आ. गोरे असल्यामुळे ते बांधतील ते तोरण आणि राबवतील ते धोरण आम्हाला मान्य असल्याचेही समर्थक पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बोराटवाडीतील मेळाव्याला भगवानराव गोरे, जि. सदस्य अरुण गोरे, सोमनाथ भोसले, अतुल जाधव, हरिभाऊ जगदाळे, रामभाऊ देवकर, शहाजीराजे गोडसे, नितीन गोडसे, दहिवडी आणि म्हसवडचे नगरसेवक आणि गावोगावचे सरपंच उपस्थित होते.
नगराध्यक्ष दिलीपभाऊ जाधव म्हणाले, गेल्या दहा वर्षात आ. गोरेंनी भान ठेवून नियोजन केले आणि बेभान होऊन कामे केली म्हणूनच माण खटावमध्ये उरमोडीचे पाणी आले, हजारो कोटींची विकासकामे झाली. ज्या प्रभाकर देशमुखांनी आयुक्त असताना तालुक्यातील एकालाही नोकरी लावली नाही, पाणी योजनांसाठी काहीच केले नाही ते आता जनतेला भुलवायचे काम करत आहेत. अधिकार असताना एखाद्या रुग्णाला मदत केली नाही आणि आता रोजगार मेळावे आणि आरोग्य शिबिरांची नाटके सुरु केली आहेत. सिमेंट बंधाऱ्यांचा पायलट प्रोजेक्ट माणमध्ये राबविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या बैठकीत त्यांनी नकारात्मक भूमिका घेतली होती.
वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले, भाजपाचे सरकार आले तेव्हा डॉ. येळगावकर राष्ट्रवादीत होते. अनिल देसाई पण राष्ट्रवादीच्याच वळचणीला होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप मित्रपक्षाला मतदान केले नाही. आ. जयकुमार गोरेंचा उमेदवार पाडायचाच म्हणून लोकसभेला त्यांनी प्रयत्न केले आणि आता यांना भाजपाचा कळवळा येत आहे. आ. गोरे काहीही झाले तरी डोईजड आहेत, एक एकट्याला ऐकणार नाहीत हे माहित आहे म्हणूनच त्यांचे कुडबुळे एकत्र आले आहे. जंगलात वाघाची हालचाल सुरु झाली की पहिल्यांदा माकडांची पळापळ होते. ती पळापळ आता सुरु झाली आहे.
दादासाहेब काळे, धोंडीराम मोरे, श्रीमंत पाटील, सयाजी लोखंडे, महिमानगडचे सरपंच गोरख मदने, अकील काझी भरत जाधव, सुनील पोरे, संजीव साळुंखे, गुलाबराव खाडे, दशरथ काटकर, सोमनाथ बुधे, दत्तत्रय पाटील, शंकरराव माळी विजय धट आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त करताना विरोधकांचा समाचार घेतला.