पुणे – मुसळधार पावसाने पीएमपीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत पीएमपीचे उत्पन्न 3 कोटी 36 लाख झाले असून इतर दिवसांच्या तुलनेत दिवसाला 35 लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
पावसामुळे नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडेनासे झाले आहेत. त्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे बसेस रिकाम्या धावत असल्याने शनिवार (दि.3) ते सोमवार (दि.5) या तीन दिवसांत प्रती दिवशी तीन लाख प्रवासी घटले आहेत. दीड हजार बसेसच्या माध्यमातून पीएमपीएलला दररोज सुमारे 1 कोटी 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
पावसाळ्यामध्ये यात अधिक वाढ होते. पावसामुळे अनेक प्रवासी स्वतःच्या दुुचाकीऐवजी पीएमपीएलला प्राधान्य देतात. पण, गेल्या तीन दिवसांत प्रशासनाचा गल्ला अपुरा भरला आहे.
दिवसाला 100 बसेस कमी
पावसामुळे शहरातील विविध मार्गावरील बस रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या तीन दिवसांतील परिस्थिती पाहता दिवसाला रस्त्यावर 100 बसेस कमी करण्यात आल्याचे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले.