मुंबई – राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावले टाकली असतील. पण शरद पवारच भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे, असे मत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. यावरून मविआमध्येही खरखर वाढली आहे. दोन्ही पवारांची अशा प्रकारची भेट हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. या बद्दल आम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावर बच्चू कडू यांनीही आज आपले मत मांडले.
कडू म्हणाले, जे वरवर दिसते ते तसे नाहीये. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही वाद नाही. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. तो सुसंवाद आहे. सध्या दोघांचे मार्ग वेगळे असतीलही पण भविष्यात ते एकत्र येतील असे दिसते. काका-पुतण्याच्या भेटीगाठीवरून संभ्रमित होण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही वावगे नाही. आम्हीही तेच करत असतो. शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणे शक्य नाही. समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चालले हे ओळखणे अशक्य आहे.
…तर भाजपला परिणाम भोगावे लागतील
दरम्यान, आजारपणाचे कारण देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले जाणार व त्यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसवले जाईल, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. यावर कडू म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केले तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील. शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत. जेव्हा भाजपसोबत कोणीच नव्हते तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली. वर्षभरानंतर त्यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केले तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.