राजगुरूनगर येथे उद्धव ठाकरे यांचा घणाघात
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या भूतांना गाडून टाका. आपल्या हक्काचे सरकार आले, तुम्ही हक्काचा खासदार घालवला. आता राज्यात आपले सरकार येणार आहे. आमदार सुरेश गोरे यांना निवडून द्या. तुम्हाला दिलेली वचने मी पूर्ण करणार, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजगुरूनगर येथे केले.
खेड-आळंदी विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली, त्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, आमदार नीलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख आबा कटके, राम गावडे, जिल्हा संघटक विजया शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, आरपीआयचे संतोष डोळस यांच्यासह प्रचंड संख्येने शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.
सुरेश गोरे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत मी विकासाचे काम केले आहे. तालुक्यातील कानाकोपऱ्यात जाऊन आमदाराचे काम केले. 800 कोटींची कामे केली. सर्व समाजातील घटकाला बरोबर घेऊन काम केले. यात पक्ष माझ्या पाठीशी ठाम राहिला. या तालुक्यात विकासाबरोबर खऱ्या अर्थाने तालुका शांत केला याचे मला मोठे समाधान आहे. आमदार झालो तेव्हा 1500 कोटीचे कामे झाली होती. प्रत्यक्षात मात्र, ही कामे भलतीच झाली होती. गरजेची कामे प्रलंबित होती. ही कामे प्राधान्याने केली. विरोधक माझ्यावर नाही ते आरोप करीत आहेत. त्यांनी टीका करताना पातळी सोडली आहे. माझ्या मिशावर टीका करणाऱ्यांना साधे उत्तर दिल आहे. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या मागे ठामपणे उभे असून जनतेचीही माला साथ आहे. या जोरावरच तालुक्याचे चित्र बदलण्याचे काम केले अजूनही करायचे आहे. तालुक्यातील पाच वर्षांत विकास आणि हद्दपार केलेली गुन्हेगारी यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी नमूद केले.
मी “सिंघम’ झालोय – आमदार गोरे
खेड तालुक्याची परंपरा आहे चुकीचे काम खपवून घेतले जात नाही. खेड तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे म्हणून मला मतदान करावे. सगळी कामे मार्गी लागतील. तालुक्यातील लोकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मी हाडाचा शिवसैनिक आहे, राहणार आहे आता. मी “सिंघम’ झालोय कुणाला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांचे नाव न घेता देताच त्यांच्या चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मागच्या वेळी घराघरात ठरले, आताही ठरले आहे. आमदार सुरेश गोरे हेच होणार. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी चुकीचा निर्णय घेतला हे मी पाहिले आहे, त्यामुळे या निवडणुकीत आमदार सुरेश गोरे यांच्या मागे मी ठाम आहे. मला कमी मतदान केले. आता सुरेश गोरे यांना जास्त मतदान करा.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार