लखनौ – नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, “साप और कोब्राने मिलकर नेवलेको जितने नही दिया. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी छुपी युती करून समाजवादी पक्षाचा पराभव केला असे त्यांनी सूचित केले आहे.
भाजपच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून भाजप विरोधात बंडखोरी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचाही या निवडणुकीत फाझिलनगर मतदारसंघातून पराभव झाला. त्यावर भाष्य करताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रीया आहे. आज एएनआयशी बोलताना मौर्य म्हणाले, मुंगूस नेहमीच सापापेक्षा श्रेष्ठ असतो, पण साप आणि कोब्रा या दोघांनी मिळून मुंगूस जिंकू दिले नाही ही वेगळी बाब आहे.
ज्या मुद्द्यांमुळे मी भाजप सोडले होते ते मुद्दे आजही प्रासंगिक आहेत. ते मुद्दे मला लोकांपर्यंत पोहोचवता आले नाहीत. तथापि समाजवादी पक्षाचा जनाधार वाढला आहे याचे मला समाधान आहे. सपाला एक मोठी शक्ती बनवण्यासाठी आमची मोहीम सुरूच राहील असे त्यांनी म्हटले आहे.