मुंबई – यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच रुग्णालयात श्रीच्या सेवेकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार या कार्यक्रमाला केंद्री गृहमंत्री अमित शहा देखील पोहोचले होते. मात्र, आता स्वतः अमित शहा यांनी या घटनेची दखल घेतली असून, आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून अमित शहा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या घटनेवर त्यांनी दु:ख व्यक्त केल्याचं यातून दिसून येत आहे.
काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.
मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.— Amit Shah (@AmitShah) April 17, 2023
नेमकं अमित शहा आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले….
“काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो..’ या आशयाची पोस्ट अमित शहा यांनी शेअर केली आहे.
यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. मात्र तळपत्या उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 123 हून अधिक लोकांना तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. यातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.