मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज दुपारपासूनच शिवाजी पार्क मैदानावर मनसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागले होते.यावेळी बोलताना राज ठाकरेंनी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडतानाचा किस्सा सांगितलला. राणे बाहेरच पडले नसते असा खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला.
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. धनुष्यबाण तुझा कि माझा हे होत असताना वेदना होत होत्या. राजकारण लहानपानपासून पाहत आलो अनुभवत आलो. असंख्य लोकांच्या घामातून उभी राहिलेली ती संघटना मी पाहिली. मी बाहेर पडतानाही म्हंटल होत ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार आणि त्यात वाटेकरी होण्याची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडलो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
नारायण राणे बाहेरच गेले नसते. जेव्हा नारायण राणे बाहेर जात होते तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं त्यांना जाऊ देऊ नका त्यानंतर मी राणेंना फोन केला जाऊ नका.. आपल्याला साहेबांकडे जायचे आहे त्यावर राणे म्हणाले आलोच. त्यानंतर बाळासाहेबांचा मला पुन्हा फोन आला त्यांना नको बोलावूस. मला मागे कोणीतरी बोलत असल्याचा आवाज येत होता त्यानंतर मी राणेंना सांगितलं नका येऊ. असा खुलासा राज ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच ज्या प्रकारचं राजकरण सुरु होत त्याचा शेवट हा झाला… मला त्यांच काय झालं याचा फरक पडत नाही परंतु जे नाव मी लहानपनापासून पाहत आलो ते टांगताना पाहून त्रास झाला असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
अवधूत गुप्तेंकडून मनसेचं नवं प्रचार गीत सादर
मराठीत गायक दिग्दर्शक अवधूत गुप्तेंकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नवीन गाणं यावेळी सादर करण्यात आलं. मनसेचं नवं गाणं यावेळी गुप्ते आणि त्यांच्या टीमने लाइव्ह सादर केलं. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा.. नवनिर्माण घडवूया.. मनसे.. असे बोल असलेलं नवं गाणं लॉंच करण्यात आलं. उपस्थित मनसैनिकांनी यावेळी या गाण्याला उत्सुफूर्त प्रतिसाद दिला.
संदीप देशपांडेची उद्धव ठाकरेंवर टीका
शिवाजी पार्कवर आयोजित या गुढी पाडव्यानिमित्तच्या सभेदरम्यान बोलताना संदीप देशपांडे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी कायमच म्हणजेच बाळासाहेब ठाकरे असतानाही राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र केलं असं देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे राज ठाकरे कधीही म्हणाले नाहीत कारण त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. उद्धव ठाकरेंनी अशी परिस्थिती निर्माण केली की राज ठाकरे पक्षाबाहेर पडले पाहिजेत अशी टीका देखील यावेळी देशपांडे यांनी केली.