नाणे मावळ ( अतुल चोपडे पाटील ) – नाणे मावळ हा भात पिकासाठी प्रसिध्द असला तरी देखील नाणे मावळात सेंद्रिय आळू पिकाचे उत्पादन होत आहे. हा अळू खाताना घशाला त्रास वा जळजळ होत नाही. चवीला चांगला आहे. त्यामुळे या अळुला बाजारात चांगली मागणी आहे.
नाणे मावळातील कांब्रे येथील शेतकरी दशरथ नामदेव गायकवाड यांनी त्याच्या परस बागेत सेंदीय खतावर अळू पिकाचे उत्पादन घेतले आहे. सपाट जागेवर अळुची लागवड केली आहे. या पिकाला दररोज वा किमान एक दिवसाआड पाणी द्यावेच लागते. चांगले व दर्जेदार पीक यावे यासाठी लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यात शेणखत व लेंडी खत वापरले जाते. भाता ऐवजी अळू हे गायकवाड कुटुंबाने मुख्य पीक बनले आहे.
या पिकातून त्यांनी कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक गणित बसवले आहे. कांब्रे गावा पासून ५ किलो मीटर अंतरावर कामशेत ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारात कोणत्या भाजीपाल्याची आवक कमी असते याचा अनुभवाने अभ्यास त्यांची दशरथ नामदेव गायकवाड यांची सून लक्ष्मी प्रकाश गायकवाड यांनी केला. त्यानुसार अळू हे पीक व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते हे जाणवले. करोना काळापासून त्यांनी या अळू पिकात आता सातत्य जपले आहे. तर विक्रीची जबाबदारी त्यांची सून लक्ष्मी प्रकाश गायकवाड या स्वतः पाहतात.
थंडीच्या दिवसात वाढ कमी असते. या काळात फार चांगले उत्पादन मिळत नाही. या काळात शेणखत देणे फायदेशीर ठरते. वर्षाला पाच ते सहा गाड्या शेणखत दिले जाते. त्यामुळे अळू दर्जेदार होतो. साधारणपणे प्रत्येक चार ते पाच दिवसांनी काढणी होते. त्यावेळी मुख्य झाडाच्या बाजूची पाने काढली जातात.
सध्या लग्नसराई असल्याने येथील जेवणावळीत अळुच्या भाजीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा फायदा गायकवाड कुटुंबास होतो. एकाच ठिकाणी दर्जेदार आणि सेंद्रीय अळु मिळत असल्याने कॅटरिंगवालेही येथून अळू घेऊन जातात. तसेच आता आसपासच्या नागरिकांनाही सेंद्रीय अळुबाबत माहिती झाल्याने काहीजण थेट ताजी अळू घेण्यासाठी गायकवाड यांच्या घरी येतात.