-विजय शेंडगे
एक काळ असा होता की, छोट्या मुलांचं भावविश्व डोळ्यासमोर ठेवून साहित्यनिर्मिती केली जायची. परंतु अलीकडे असा प्रयत्न होताना दिसत नाही. याला लेखकांची उदासीनता आणि प्रकाशकांची व्यापारीवृत्ती अशा दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत.
वाचनसंस्कृती लयाला गेली असे समजून प्रकाशक छापत नाहीत आणि प्रकाशक छापत नाहीत म्हणून साहित्यिक लिहीत नाहीत. असं असताना शिवाजी चाळक आवर्जून बालसाहित्य लिहीत आहेत. “जंगल-दंगल’ हा त्यांचा बालकवितासंग्रह बालमित्रांच्या भेटीसाठी उत्सुक आहे.
मोठे झाल्यावर, लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणं सोपं नाही. मला आठवतंय मी सहकुटुंब गावी गेलो होतो. बैलगाडी घेऊन शेतात निघालो होतो. माझा पाच-सहा वर्षांचा मुलगा माझ्यासोबत होता. बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाकडे त्याच लक्ष गेलं. रस्त्यात खड्डे होते. ते पाहून तो म्हणाला, “बाबा, बैलांसाठी कोणी बूट का शिवत नाही हो?’ शिवाजी चाळक त्यांचं वय विसरून लहान मुलांच्या अशा विश्वाचा धांडोळा घेत आहेत.
आपल्या मनोगतात कवी म्हणतात, माझ्या नातवाशी, राजवर्धनशी, संवाद साधताना या कविता आकाराला आल्या आहेत. यातल्या कविता वाचताना त्या सहजपणाची अनुभूती येते. दोन धपाटे घालून लहान मूल कधीच झोपत नाही. त्याला थोपटताना कोणी, “झोप, झोप’ म्हणत नाही. बाळाला थोपटताना कोणतीही आई, “गाई, गाई’च म्हणते. पण थोपटण्यामधली लय आणि शब्दांमधला गोडवा बाळाला झोपी घालतो.
जंगल दंगल या पुस्तकातल्या पहिल्या कवितेपासून शेवटच्या कवितेपर्यंत हळुवारतेचा अनुभव येतो. “कपिला’ ही कविता म्हणत लहान मुलाच्या तोंडाशी दुधाचा ग्लास नेला तर ते अगदी सहज दूध गट्टम करतील, असा विश्वास ही कविता देते. पाण्यातला मासा आईच्या कुशीत कधी झोपत असेल? पोपटाने हिरवा रंग झाडाच्या पानांकडून चोरला असेल काय? मांजरीला देवाने सोंड का दिली नसावी? मुलांची आणि चिमणीची दोस्ती का असते? असे कितीतरी बालसुलभ प्रश्न कवीला पडतात आणि त्या प्रश्नांची तेवढीच बालसुलभ उत्तरं ते देतात.
“कोकीळ लागले मंजुळ गाऊ
घुबड लागले उठून जाऊ’
या ओळी “गाढवाला गुळाची चव काय’ या म्हणीची बालआवृत्ती वाटते. तर –
“कणाकणाचा करून साठा
लंकेच्या पुलात तुझाही वाटा’
या ओळी लंकेचा पूल, खारीचा वाटा, आणि रामायणातील गोष्ट या बाबतीतलं मुलांचं कुतूहल जागं करतील.
अशाच बालसुलभ कविता, मुलांना हवीहवीशी वाटावीत अशी प्रत्येक पानावरची रंगीत व्यंगचित्रं यात मुलं नक्की रममाण होतील. गरज आहे ती पालकांनी हे पुस्तक मुलांच्या हातात ठेवण्याची. या पुस्तकाच्या रूपाने यशोदीपने बालसाहित्याच्या दालनात मोलाची भर घातली आहे. हे नक्की.