नवी दिल्ली -तृणमूल कॉंग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. लोकसभा निवडणूक होईपर्यंत केंद्रीय यंत्रणांचे कारवाईसत्र रोखले जावे, असे साकडे त्या पक्षाने घातले. तृणमूलच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले.
विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग, एनआयए यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या संचालकांच्या बदल्या केल्या जाव्यात, अशी मागणी तृणमूलने केली. त्या पक्षाच्या शिष्टमंडळात डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष यांचा समावेश होता.
केंद्रीय यंत्रणांचे कारवाईसत्र तीव्र बनल्याचे दिसते. ते कारवाईसत्र पक्षपाती आहे. केंद्रीय यंत्रणांच्या एकाही अधिकाऱ्याची बदली का झाली नाही? बदल्या राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांपुरत्याच मर्यादित का आहेत, असा सवाल त्या नेत्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला.
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्रीय यंत्रणांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.