नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपला नवा नारा अर्थात घोषणा तयार केली आहे. सपने नही हकीकत बुनते हैं, इसलिए सब मोदी को चुनते हैं ही ती घोषणा असून आता तीच चालवली जाणार असल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. बैठीकत विकसित भारत संकल्प अभियानासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत चर्चा केली जाणार आहे.
हिंदी भाषिक तीन राज्यांत भाजपचा मोठा विजय झाला आहे, मात्र दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात कॉंग्रेसचा विजय झाला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या विधानसभा निवडणुकांकडे सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते.
त्यात भाजपची सरशी झाल्याचे जरी म्हटले गेले असले तरी दक्षिणेकडच्या राज्यांत अर्थात जेथे हिंदी भाषा प्रबळ नाही अशा राज्यांत भाजपची कामगिरी अत्यंत शोचनीय आहे आणि तेच पक्षाच्या चिंतेचे कारण आहे. त्यात काय सुधारणा करता येईल याचाही बैठकीत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
तसेच विधानसभा निवडणुकांच्या वेळी जशी फार अगोदर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली गेली होती तसेच आता लोकसभेच्या वेळीही केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जानेवारी महिन्याच्या अखेरीस पक्षाकडून काही उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.
२०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्तेवर येण्याची किमया भाजपने साध्य केली आहे. २०१४ मध्ये अच्छे दिन आने वाले हैं हा नारा देण्यात आला होता तर २०१९ मध्ये फिर एक बार मोदी सरकार हा नारा होता. या वेळी नवी घोषणा तयार करण्यात आली असून भाजपला यंदा केंद्रात हॅटट्रीक साधायची आहे. लोक आपल्याला पुन्हा निवडून देतील असा दावा मोदी यांनी अनेक वेळा केला आहे.