नवी दिल्ली – लोकसभेच्या आगामी निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला आहे. या क्षेत्रातील लोकांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले तर विजय मिळविणे शक्य होईल असे भाजपला वाटत आहे. परंतु, भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असलेल्यांना महासचिव विनोद तावडे यांच्या समितीकडून हिरवी झेंडी मिळवावी लागणार आहे.
भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने अठराव्या लोकसभेत चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प घेतला आहे. हे ध्येय गाठण्यासाठी निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार ही पक्षाची पहिली गरज होय. अशात, बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील गाजलेल्या चेहऱ्यांना पक्षात आणून त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची भाजपची योजना आहे.
मात्र, भाजपने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून, या समितीचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच नवीन व्यक्तीला भाजपात प्रवेश दिला जाणार आहे, हे येथे विशेष. सध्या, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, कंगना राणावत आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासारखे बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांवर भाजपची नजर आहे.
भाजपने यावेळी ४०० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी विरोधी पक्षातील नेते, बॉलिवूड, क्रीडा, व्यवसाय, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रातील लोकांना संधी दिली जाणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ज्या जागांवर पराभव झाला होता त्या ठिकाणी या क्षेत्रातील लोकांना उमेदवार म्हणून मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे, विनोद तावडे यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यामागे महत्वाचे कारण आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी तृणमूल कॉग्रेसचे नेते मुकुल राय आणि बाबुल सुप्रियो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, राज्यात दीदीचे सरकार येताच या दोन्ही नेत्यांनी भाजपसोडून तृणमूल कॉग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तावडे समिती नेमण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती इतर पक्षांतील प्रभावशाली नेते आणि विद्यमान खासदार भाजपमध्ये येण्याच्या शक्यतेचा शोध घेईल.