जदयुला दोन नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात होणार समावेश
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन, केंद्र सरकारला दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थानिक पक्षांसंदर्भात वेगळे धोरण स्विकारण्याचे ठरवले आहे. याच रणनितीचा एक भाग म्हणून, बिहारमधील भाजपाचा मित्रपक्ष जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपामधील अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जदयूने भाजपाचा हा प्रस्ताव स्विकारला असल्याचेही सांगण्यात येत आहे, याविषयी एका इंग्रजी वर्तमानपत्राने माहिती दिली आहे.
नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे दोन ज्येष्ठ खासदार राजीव रंजन आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात आल्यास, भाजपाने स्थानिक पक्षासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. नितीश कुमार हे बिहारमध्ये एनडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे अमित शाह यांनी आधीच सांगितले आहे. ज्येष्ठ भाजपा नेत्याने माहिती दिली. याचसोबत, आगामी निवडणुकांमध्ये बिहारमध्ये त्रिशंकु परिस्थिती भाजपा नेत्यांना नकोय. लालू प्रसाद यांच्या राजद पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपाने नरमाईचे धोरण स्विकारत जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे.
मध्यंतरीच्या काळात कॅब आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरुन जदयू आणि भाजपामध्ये कुरघोडी सुरु होत्या. मात्र यानंतर जदयूने कॅबच्या समर्थनार्थ लोकसभेत मतदान केलं होतं. गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि अन्य स्थानिक पक्षांनीही भाजपाची साथ सोडली होती. त्यामुळे भविष्यकाळात आणखी एक राज्य हातातून न जाऊ देण्यासाठी भाजपाने आस्ते कदम भूमिका स्विकारायची ठरवली आहे.