नवी दिल्ली -बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख जितनराम मांझी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला आणखी एक मित्रपक्ष मिळणार असल्याचे सूचित होत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षात (जेडीयू) आणि एचएएममध्ये दुरावा निर्माण झाला. त्यातून एचएएमने त्या राज्यातील महाआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यापाठोपाठ मांझी यांनी शहा यांची भेट घेतल्याने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत (एनडीए) एचएएम सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण राज्यात एनडीएला भक्कम बनवणे भाजपसाठी महत्वाचे बनले आहे. अशात एचएएमसारखा मित्रपक्ष जोडला जाणे भाजपच्या दृष्टीने दिलासादायी ठरणारे आहे.
नितीश यांच्या जेडीयूने संबंध तोडल्याने भाजपला बिहारची सत्ता गमवावी लागली. त्या राज्यात सत्तेवर असणारी महाआघाडी जेडीयू, राजद, कॉंग्रेस, डाव्या पक्षांच्या सहभागामुळे मजबूत मानली जाते. त्याउलट, बिहारमध्ये भाजपच्या साथीला सध्या केवळ लोजपचा एक गट आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय लोक जनता दल भाजपचा मित्र बनणार असल्याचे स्पष्ट झाले. त्या पक्षाचे नेतृत्व नितीश यांच्यापासून दुरावलेले नेते उपेंद्र कुशवाहा करत आहेत. त्या पक्षापाठोपाठ एचएएमचे एनडीएमध्ये सहभागी होण्याची बाब आता केवळ औपचारिकता राहिल्याचे मानले जात आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या भरभक्कम 40 जागा आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने ते राज्य अतिशय महत्वाचे आहे. एकीकडे नितीश देश पातळीवर विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठे योगदान देत आहेत. तर, दुसरीकडे भाजपने बिहारमध्ये नितीश यांना शह देण्यासाठी एनडीएची ताकद वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसते.