मुंबई – देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाची ताकद जिथे नाही, तिथे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी केला आहे. तसेच जातीय विद्वेष वाढवणाऱ्या शक्तींच्या हातात हा देश जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, केंद्रीय खजिनदार सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ खडसे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मी खानदेशात गेलो होतो, तिथे लक्षात आले की कापूस शेतकऱ्यांना घरात ठेवावा लागला आहे. मोदींनी सांगितले होते की, तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पादन डबल करू. पण राज्यातील 391 शेतकऱ्यांनी मागच्या पाच महिन्यात आत्महत्या केली आहे. 23 जानेवारी 2023 पासून 23 मे पर्यंत राज्यातील 3 हजार 152 महिला बेपत्ता आहेत. ही चांगली बाब नाही.
गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, अकोला, अमळनेर अशा शहरात दंगली झाल्या. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथे नाही तिथे असे प्रकार सुरू आहेत. राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे. मणिपूर प्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान अमेरिकेत गेले आहेत. त्यांना कुठे जायचे असेल तिथे त्यांनी जावे.
मात्र देशातील प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. मणिपूरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दंगल सुरू आहे. त्या ठिकाणाहून मिळणारी माहिती अतिशय गंभीर आहे. एका अधिकाऱ्याने वक्तव्य केले की, मणिपूरमध्ये जे घडत आहे ते गंभीर आहे. त्यामुळे आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हेच कळत नाही. चीनच्या शेजारी असलेल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे. राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला.
इर्शेपोटी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले नाही
मणिपूर जळत असताना राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनाचे निमंत्रण का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, संसदेच्या पाटीवर फक्त माझं नाव असले पाहिजे. या इर्शेपोटी मोदींनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले नाही.
राष्ट्रपती तिथे उपस्थित असत्या तर प्रोटोकॉलप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांच्याच हस्ते उद्घाटन करावे लागले असते. मग मोदींचे नाव प्रथम आले नसते. त्यामुळे राष्ट्रपतींनी बोलावले गेले नाही, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.