गोरखपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये २०१४ आणि २०१९ पेक्षाही मोठी लाट असेल आणि भारतीय जनता पार्टीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा गोरखपूर येथील भाजपचे खासदार आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रवि किशन यांनी यांनी केला आहे.
ते म्हणाले की एक वेळ अशी होती की अयोध्येत काठ्या चालायच्या आणि गोळीबार व्हायचा. मात्र आज मोदी आणि योगी युगात शांतपणे राम मंदिर साकारते आहे. १०० कोटी सनातनींच्या आस्थेशी निगडीत हा विषय आहे. मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सगळ्यांनीच गेले पाहिजे.
काही लोकांनी प्रभू रामाच्या अस्तित्वाबाबतच शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांनीही अयोध्येला गेले पाहिजे. तेथे गेल्याने सगळ्यांना समृध्दीच मिळेल. जे लोक जाणार नाहीत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की हीच ती मंडळी आहे की ज्यांना भगवान रामाला पाहायची आजही इच्छा नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की विरोधी पक्षांनी चांगली तयारी सुरू केली आहे. मात्र प्रत्येक राज्यात त्यांना दोन किंवा तीनच जागा मिळणार आहेत. मात्र आम्ही जमीनीवर उतरून जनतेच्या हिताची कामे केली आहेत. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला यावेळी चारशेपेक्षा अधिक जागा मिळतील.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की आता पुन्हा आमचाच विजय होणार आहे. प्रामाणिकपणा आणि विकासाच्या धोरणाच्या आधारावर मोदी यांना विजय प्राप्त होईल आणि सगळ्याच बाबी त्यांना अनुकूल असल्याचे रवि किशन म्हणाले.