बेंगळुरू – येत्या चार पाच महिन्यात कर्नाटक परिवहन मंडळात वीजेवर चालणाऱ्या किमान चौदाशे बसेस दाखल केल्या जातील अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. ते म्हणाले की येत्या एप्रिल महिन्यापर्यंत या बसेस कर्नाटकात कार्यरत होतील. पहिल्या टप्प्यात त्यांनी आज कर्नाटक परिवहन मंडळातील १०० इलेक्ट्रिक बसेसला येथील विधान सौधा येथे हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
शक्ती योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कर्नाटकातील महिलांनी राज्य परिवहन बसमध्ये 120 कोटी प्रवास मोफत केले आहेत. एकूण 40 लाख लोक दररोज परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करतात. यात महिलांना पुर्ण मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवांना चालना देण्यासाठी आणि शहरातील वाढत्या वाहन प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक बसेस जोडल्या गेल्या आहेत, असेही ते म्हणाले.
भाजपने आमच्या सरकारच्या महिलांसाठी मोफत बस प्रवास सेवेवरही टीका केली असल्याचे सांगून ते म्हणाले की भाजपला ते सत्तेत असताना ही सुविधा देता आलेली नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट होतो आहे. आमच्या हमीभावामुळे, लोकांची क्रयशक्ती आणि राज्याची आर्थिक उलाढालही वाढत आहे. या योजनांमुळे कामगार, शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होते. ते पैसे त्यांच्या कुटुंबाच्या इतर गरजांसाठी वापरतात. त्यामुळे, लाखो कुटुंबांची आर्थिक ताकदही वाढत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील सुमारे 4.30 कोटी लोकांना सरकारी हमी योजनांचा थेट लाभ मिळत आहे. त्याद्वारे गरीब आणि कामगार वर्गाला आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे,असे ते म्हणाले. आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला, गरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस सरकार हे साध्य करण्यासाठी सत्तेवर आले होते. भाजपच्या मागील राजवटीने लोकांना सक्षम करण्यासाठी काहीही केले नाही. उलट ते टीका करत आहेत, असे ते पुढे म्हणाले.