नवी दिल्ली – दक्षिण भारतात भारतीय जनता पार्टीची अत्यंत वाईट कामगिरी होणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केला. दक्षिण भारतातील १३० जागांपैकी भाजपला १५ पेक्षाही कमी जागा मिळतील असे त्यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला.
भाजपला जेमतेम १२ ते १५ जागा मिळतील आणि अन्य जागांवर इंडिया आघाडीचा विजय होईल. केरळमध्ये लोकसभेच्या सर्व २० जागा कॉंग्रेसला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी ज्या जागा येथे लढवते आहे तेथे त्यांची अनामत रक्कमही जप्त होईल असे ते म्हणाले.
दरम्यान, तेलंगणा या आपल्या राज्यात १७ पैकी १४ जागांवर कॉंग्रेसला विजय मिळेल असे नमूद करून भाजपच्या अबकी बार ४०० पार बद्दल रेड्डी म्हणाले की तेलंगण विधानसभेच्या २०२३ च्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीने असाच प्रचार केला होता.
आपल्याला १०० जागा मिळतील असे ते म्हणत होते. मात्र त्यांना ३९ जागा मिळाल्या. के. चंद्रशेखर राव यांनी त्यावेळी जे केले तेच आता भारतीय जनता पार्टी करते आहे. लोकांना भ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावेळी मतदार त्यांना धडा शिकवतील.