कोल्हापूर(प्रतिनिधी) : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ‘पंढरपूरला जायचं असेल तर गोव्याची गाडी पकडून चालत नाही’ अशा शब्दांत बोचरी टीका केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेटले आणि अतिशय हास्यास्पद आणि लोकांची दिशाभूल करणारी कृती केली. मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना निवेदन दिले आणि राज्यपालांनी ते निवेदन राष्ट्रपतींना पाठवावे अशी विनंती केली.
जायचं आहे पंढरपूरला आणि गाडी पकडली आहे गोव्याला जायची. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर पहिल्यांदा राज्याला मागास आयोग नेमावा लागेल. राज्याच्या मागास आयोगाने पुन्हा एकदा मराठा समाजाला मागास ठरवावं लागेल. राज्याचा मागास आयोगाचा अहवाल हा कॅबिनेटने स्वीकारावा लागेल. नंतर हा रिपोर्ट केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल.
केंद्रीय मागासवर्ग आयोग त्या अहवालाची छाननी करुन राष्ट्रपतीला सादर करावा लागेल. मग राष्ट्रपती राज्याला सांगतात की तुम्ही तुमचा कायदा करा’हे सगळी प्रक्रिया राहिली बाजूला. तेव्हा राज्य सरकारने लोकांची दिशाभूल करू नये. मराठा समाजाला उल्लू बनविण्याचे काम थांबवा. कायद्याच्या खोलात जा. तरच मराठा समाजाला न्याय मिळेल. समाज शांत होईल. पंढरपूरला जायचं असेल तर गोव्याची गाडी पकडून चालत नाही.’असा टोला पाटील यांनी लगावला.