ठाणे – भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रोरल बॉंडच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी पक्ष फोडणे आणि सरकारे पाडणे अशी कामे केली असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते महाराष्ट्रातील ठाण्यातील जांभळी नाका येथे लोकांना संबोधित करताना बोलत होते.
इलेक्टोरल बाँड्स योजना हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खंडणी रॅकेट आहे आणि जे विरोध करतात, त्यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि आयकर विभाग यांचा सामना करावा लागतो असा आरोप त्यांनी केला. या खंडणी रॅकेटचा पैसा विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील सरकारे पाडण्यासाठी आणि राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरला गेला.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुकट पळून गेले असे तुम्हाला वाटते का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीमुळे दोन पक्षांमध्ये फूट पडल्याचा उल्लेख केला. मागास समाजातील लोक, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि सामान्य श्रेणीतील गरीब लोक हे एकूण लोकसंख्येच्या ८० टक्क्यांहून अधिक आहेत, परंतु सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च स्थानांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे, गांधी म्हणाले.
महामारीच्या काळात भारतात कोविड-19 मुळे ५०लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. जेव्हा लोक करोनामुळे मरत होते, तेव्हा लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पंतप्रधान मोदी इलेक्टोरल बाँड्सच्या रूपात पैसे घेत होते असा आरोप त्यांनी केला. अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्याला केवळ चित्रपट तारे आणि आघाडीचे उद्योगपती पाहुणे म्हणून उपस्थित होते, पण तेथे गरीबांना स्थान नव्हते असा आरोपही गांधींनी केला.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या कार्यक्रमाला परवानगी नव्हती कारण त्या एक आदिवासी महिला आहेत असा दावाही त्यांनी केला. गांधींची यात्रा ठाण्यात दाखल झाली तेव्हा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (यूबीटी) नेते केदार दिघे उपस्थित होते. जिल्ह्यातील भिवंडी येथे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी त्यांचे स्वागत केले.