येरवडा, दि. 15 (प्रतिनिधी) -देशातील अनेक राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. मात्र, असे असूनही महाराष्ट्रात “भाजप’ची स्वबळावर सत्ता नसल्याची खंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर भाजपच्या वतीने बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मकरंद देशपांडे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, राजेश पांडे, वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष खांदवे, संतोष राजगुरु, अल्पसंख्यांक अध्यक्ष अन्वर पठाण तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रास्ताविक केले तर संतोष खांदवे यांनी आभार मानले.
कॉंग्रेस संपवली…
यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते फ्रेंड ऑफ बीजेपी या हेल्पलाइन नंबरचे अनावरण करण्यात आले. वडगावशेरी विधानसभेमधील अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेस आपण रांगेने संपवली असून कोल्हापूर, सांगली, सातारासह पुण्यातीलही संपवली. पुणे ग्रामीणमध्ये ही संपवायची आहे, यासाठी पुण्यातील कार्यकर्त्यांचा सहयोग लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा,विधानसभा आणि येणाऱ्या पालिका निवडणुका जिंकायच्या आहेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.