गुरूदासपूर – दुर्दैवाने आज पंजाबमधील सरकार रिमोट कंट्रोलद्वारे चालवले जाते आहे. दिल्लीचे दरबारी पंजाबमध्ये राज्य करत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की पंजाबचे मुख्यमंत्री त्यांच्या हिमतीने एक निर्णयही घेऊ शकत नाहीत.
आपले सरकार चालवण्यासाठी नवे आदेश घेण्याकरता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात जावे लागते आहे. १ जूननंतर भ्रष्टाचारी पुन्हा तुरूंगात जातील. मग पंजाबचे सरकार पुन्हा तुरूंगातून चालणार का?
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्ला करताना मोदी म्हणाले इंडिया आघाडीचा खरा चेहरा पंजाबला माहिती आहे. त्यांच्याकडूनच पंजाबचे सगळ्यांत जास्त नुकसान झाले आहे. विभाजन, अस्थिरता, दहशतवाद, पंजाबमधील बंधुभावावर हल्ला, येथील लोकांच्या विश्वासावर हल्ला झाला आहे. पंजाबमधील विभाजनवादाला यांनीच हवा दिली आणि दिल्लीत शीखांचा नरसंहार केला अशी टीका केली.
दरम्यान, पंजाबच्या अगोदर हिमाचल प्रदेशात झालेल्या सभेत त्यांनी कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले. देशातील प्रमुख राजकीय पक्षाचा अयोध्येतील राम मंदिराला कुलूप लावण्याचा इरादा आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण हिरावून घेत ते मुस्लिमांना देण्याचे कारस्थान रचले जाते आहे. मी येथे स्वत:साठी किंवा माझ्या कुटुंबासाठी नाही तर विकसित राष्ट्र बनवण्यासाठी, विकसित हिमाचल प्रदेश बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला तिसरा कार्यकाळ मिळावा असा आशीर्वाद तुमच्याकडे मागण्यासाठी आलो आहे.