नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन वर्षांपासून म्हणत आहेत की १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांनी मला अटक केली. मनिष सिसोदिया, संजय सिंह यांनाही अटक केली. ५०० पेक्षा जास्त वेळा छापे टाकले, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.
आता पंतप्रधान एका मुलाखतीत म्हणाले की केजरीवाल अनुभवी चोर आहे व त्यामुळे मद्य धोरण घोटाळ्यात काही सापडले नाही. केवळ काही सापडले नाही ही बाब लपवण्यासाठीच ते मला अनुभवी चोर म्हणत आहेत. वास्तविक सत्य हे आहे की मद्य घोटाळ्याचे हे प्रकरणच बोगस आहे. त्यामुळे मी पंतप्रधानांना सांगतो की त्यांनी चुकीच्या पध्दतीने ज्यांना अटक केली आहे त्या सगळ्यांची सुटका करावी, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देणे माझ्या लढ्याचा आणि संघर्षाचा एक भाग आहे. मी कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. मी राजीनामा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे कारण त्यानंतर दिल्लीतील सरकार पाडून भाजपचे सरकार आणायचे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र मी तुरूंगातूनच सरकार चालवणार आहे आणि मुख्यमंत्री म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्यात यासाठी त्यांना तुरूंगात मला सुविधाही द्याव्या लागतील.
माझ्या राजीनाम्यासाठी कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली. मात्र न्यायालयानेही आम्ही त्यांना पदावरून हटवू शकत नाही असे म्हणत याचिका फेटाळली. केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही याची मोदी यांना कल्पना असल्यामुळे ते असे प्रकार करत आहेत. मात्र मी लोकशाही धोक्यात घालू शकत नाही.