नवी दिल्ली : राजकारणात सध्या पक्षांतराची प्रकरणं दिवसागणिक समोर येत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे काँग्रेसमध्ये सध्या सुरु असणारा गोंधळ. दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही पक्ष बदलाचे वारे वाहत आहे. भाजपाचे आमदार अशोक लाहिरी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा बंगालच्या राजकारणात सुरू होती. यासंदर्भात लाहिरी यांनी मौन सोडत पक्षांतराबद्दलच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
“मी काही मुकूल (आंब्याचा गळणारा मोहोर) नाही, जो पक्ष सोडेल”, असे म्हणत त्यांनी भाजपा सोडून तृणमूलमध्ये सामील झालेल्या मुकूल रॉय यांच्यावर निशाणा साधला. लाहिरी हे बालुरघाट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. त्यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना लाहिरी यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. यावेळी बोलताना “मी टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांमुळे मलाही धक्का बसला आहे. मी मुकूल (आंब्याचा गळणारा मोहोर) नाही, जो पक्ष सोडेल. लोकांनी मला भाजपच्या तिकिटावर निवडून दिले आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम करेन. मी बंगालच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मी नेहमीच राज्य सरकारवर टीका करेन असे नाही. जर त्यांनी काही चांगले केले तर मी नक्कीच त्यांचे कौतुक करेन. त्यांना गरज असेल तिथं मी त्यांना सूचनावजा सल्ला देईन,” असंही ते म्हणाले.
“तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किंवा पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांकडून कोणताही संवाद झाला नाही. किंवा मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणताही अर्ज पाठवलेला नाही. मी ‘आयाराम-गयाराम’ नाही. मी पक्ष बदलत आहे का, असं जर कोणी मला विचारलं, तर ते मला खूप अपमानास्पद वाटतं,” असेही लाहिरी म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये अनेक भाजपा नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो टीएमसीमध्ये सामील झाले. तर, त्यापूर्वी भाजपचे माजी आमदार सौमेन रॉय आणि तन्मय घोष, मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय टीएमसीमध्ये सामील झाले होते.