मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे नेते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलने केली, एवढेच नाही तर नेत्यांनी मलिक यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी बॅनर ठेवला असून त्यावर भाजपचे सर्व आमदार स्वाक्षरी करत आहेत.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केल्यापासून भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठीशी असून त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अलीकडेच अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. मलिक यांच्या अटकेपासून भाजप आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत भाजपची आक्रमक भूमिका कायम असेल, असे भाजपने म्हटले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबवत आहे.