सांता क्लारा – पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकतेची आवश्यकता अधोरेखित करत भारतीय जनता पार्टीला पराभूत केले जाऊ शकते असा विश्वास कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. येथील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना राहुल म्हणाले की, विरोधी पक्षांची योग्यपणे एकजूट झाली तर त्यांना (भाजपला) हरवता येऊ शकते.
यावर आता कॉंग्रेस पक्षाचे काम सुरू असून याच दिशेने आम्ही पुढे जात आहोत. भारतीय जनता पार्टीच्या दुबळ्या बाजू कोणत्या आहेत ते मी स्पष्टपणे पाहु शकतो. तुम्ही कर्नाटकचे उदाहरण पाहिले असेल. भाजपला केवळ कॉंग्रेसच टक्कर देऊ शकते आणि मातही देऊ शकते. ज्या प्रकाराने आम्ही हा विजय मिळवला तो मात्र नीटपणे समजून घेतला गेलेला नाही.
भारत जोडो यात्रेद्वारे या विजयाची पायाभरणी केली गेली. एक पूर्णपणे वेगळा दृष्टीकोन स्विकारत आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो. कर्नाटकात कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपने 10 पट अधिक पैसे खर्च केले. मात्र तरीही त्यांना अपयश आले. भाजपच्या विरोधात पर्यायी दृष्टीकोनाची गरज आहे. विरोधी पक्षांना केवळ एकत्र आणून भागणार नाही. तर एक वैचारिक पर्यायही द्यावा लागणार आहे. त्या अनुशंगाने विचार केला तर भारत जोडो यात्रा हे त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते.
आम्ही एक वेगळा दृष्टीकोन दिला आणि कोणताही विरोधी पक्ष आमच्याशी असहमत नव्हता. भारतीय जनतेला हे समजावून सांगण्याची गरज आहे की विरोधी पक्षांचा हा केवळ एक समूह नाही तर तो देशाला पुढे नेणारा एक प्रस्तावित प्रकार आहे. त्यावर कॉंग्रेस पक्षाचे काम सुरू आहे.