पुणे – पती-पत्नी संसाररुपी गाड्याची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. शेवटपर्यंत एकामेकांच्या सुखा-दु:खात ते सहभागी होत असतात. मात्र, येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात पत्नीची किडनी निकामी असल्याचे समजताच पतीने तिची काळजी घेणे सोडून दिले.
पत्नीचे किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर पती तिला भेटायला देखील आला नाही. त्यानंतर पतीने घटस्फोटाची मागणी केल्याचे समजल्यावर तिला आणखी धक्का बसला. अखेर त्यांनी संमतीने घटस्फोट घेत स्वतंत्र वाटा निवडल्या. 15 दिवसांत घटस्फोट मंजूर झाला.
2022 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात दोघेही पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. त्यामुळे घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक नसल्याचे नमूद करून लवकर हा घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निकाल दिला. निकिता व निलेश (नावे बदललेली आहेत) यांचे 2015 मध्ये पारंपरिक पद्धतीने पाहणी करून लग्न झाले.
तीन वर्षे त्यांचा संसार सुरळीत होता. 2018 मध्ये निकिता यांना अचानक उलट्यांचा त्रास व्हायला लागला. वेगवेगळ्या टेस्ट केल्यानंतर त्यांना किडनीचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. दोन वर्षे औषधोपचार केल्यानंतर 2019 मध्ये किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
पत्नीचे आजारपण लक्षात येताच नीलेश यांच्या वागण्यात बदल झाला. त्यानंतर त्यांनी निकिताकडे घटस्फोटाची मागणी करण्यास सुरुवात केली. नाइलाजास्तव निकिता उपचाराकरिता तिच्या माहेरी राहायला गेल्या. त्यांच्या माहेरची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नसल्याने त्यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च सरकारी योजना आणि काही सामाजिक संस्थांकडून जमा केला. निकिताला तिच्या वडिलांनी किडनी दान केली आहे, असे दाखल दाव्यात नमूद आहे.
दरम्यान उपचार सुरू असतानाच नीलेश यांनी येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला. माझी फसवणूक झाली, असे त्यात नमूद केले. परंतु फसवणूक झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे निलेश यांनी न्यायालयात दाखल न केल्याने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला होता.
किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर निलेश व त्यांच्या कुटुंबीयांनी निकिताशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे निकिता यांनी 2022 मध्ये ऍड. अनघा काळे यांच्यामार्फत नांदायला जाण्याचा व पोटगी मिळण्याचा अर्ज दाखल केला. दोघांना न्यायाधीश मध्यस्थाकडे पाठविण्यात आले. त्यावेळी निलेश यांनी निकिता यांना एकरकमी पोटगीची देण्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.